Marathi e-Batmya

हिवाळी अधिवेशनातील त्या भेटीवर दिपक केसरकर म्हणाले, तर शिवसेना एकसंध होईल

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष सातत्याने सुरु आहे. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही हा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र अधिवेशन सुरु असताना उपसभापतींच्या दालनासमोर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. यासंदर्भात काही प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रसारीत केले होते.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारले असता दिपक केसरकर यांनी आपली भूमिका मांडताना म्हणाले, त्यावर मी आगामी एक किंवा दोन दिवसांत बोलेन, तसेच उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले तर शिवसेना पुन्हा एकदा एकसंध होण्यास वेळ लागणार नाही, असे सूचक विधान केले.

एकनाथ शिंदे यांनी आमदारांचे मन जिंकले. त्यामुळेच आमदार त्यांच्यासोबत गेले. त्यावेळी काय काय घटना घडल्या हे बोलून दाखवणार आहे. मी ते मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवलेले आहे. सध्या नवे वर्ष आहे म्हणून मी बोलत नाहीये. एक दोन दिवस जाऊदेत. नंतर मी बोलतो. मी जेव्हा बोलेन तेव्हा महाराष्ट्रच नव्हे तर प्रत्येक शिवसैनिकाला सत्य समजेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी दिपक केसरकर म्हणाले, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी लढा लढवला, ते सहजासहजी सोडून जात नाहीत. निश्चितपणे काहीतरी घडलेलं आहे, ज्यामुळे आमदार बाहेर पडले. नेमकं काय घडलं होते, याचे उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले तर शिवसेना एकसंध होण्यास वेळ लागणार नाही, अशी आशाही व्यक्त केली.

Exit mobile version