Marathi e-Batmya

अखेर राज्य सरकारला झाली एसटी कर्मचाऱ्यांची आठवण

मुंबई: प्रतिनिधी

मागील तीन ते चार महिन्यापासून कोरोनाकाळातही आपली सेवा बजाविणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना अद्याप पगार मिळालेला नाही. तरीही हे कर्मचारी सतत काम करत आहेत. त्यामुळे अनेक एस.टी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रांत ओढावत आहे. यापार्श्वभूमीवर अखेर अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षखाली लवकरच एक बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

गेल्या तीन ते चार महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात अडचणी येत आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी लवकरच या संदर्भात बैठक घेऊन यावर मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वीही एस.टी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासंदर्भात जुलै महिन्यात पैशाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न परिवहन विभागाकडून करण्यात आला. परंतु निधीची तरतूद करणे शक्य झाले नसल्याने अखेर एस.टी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात थकित वेतन देणे शक्य झाले नाही. दरम्यान, अनेक कर्मचाऱ्यांना घरी बसविण्यात आले आहे. तर काही जणांना पगार देण्यात आला आहे. तर काहीजणांना अद्याप पगारच मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पगार देणे गरजेचे बनले आहे.

Exit mobile version