Marathi e-Batmya

एमपीएससीच्या कक्षेतील १०० टक्के व कक्षेबाहेरील ५० टक्के पदभरती होणार

राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील १०० टक्के पदभरती करणार तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या कक्षेतील पदे वगळता ५० टक्के पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

शासनाच्या २९ प्रमुख विभागांमध्ये दोन लाख १९३ जागा रिक्त असल्याबाबतची लक्षवेधी विधानपरिषदेत सादर करण्यात आली. या लक्षवेधीला उत्तर देताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई बोलत होते.

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षात भरती प्रक्रिया काही प्रमाणात मंदावली होती मात्र आता ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिमरित्या मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे ५० टक्के भरण्यात येणार आहेत तर राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील १०० टक्के पदभरती करणार आहोत. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-ब(अराजपत्रित), गट – क व गट – ड संवर्गातील नामनिर्देशनच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत जिल्हा निवड समिती, प्रादेशिक निवड समिती व राज्यस्तरीय निवड समिती स्थापन करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगास १८ ऑगस्ट २०२२ पर्यंत विविध पदांच्या भरतीकरिता प्राप्त झालेल्या गट-अ, गट-ब व गट-क मधील एकूण ११०२६ पदांच्या मागणीपत्राच्या अनुषंगाने राज्य लोकसेवा आयोगाकडून आतापर्यंत १० हजार ०२० पदांकरिता जाहिराती प्रसिध्द केलेल्या आहेत तसेच आतापर्यंत आयोगाकडून प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने पार पाडण्यात आलेल्या परीक्षा प्रक्रियेअंती आतापर्यंत ३ हजार पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे उर्वरीत पदांकरिता परीक्षा प्रक्रिया आयोगाकडून राबविण्यात येत असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

Exit mobile version