Marathi e-Batmya

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा पोलिस महासंचालकांना फोन, योग्य कारवाई करा

मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस उच्च अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी फोनद्वारे चर्चा करत योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचे आदेश दिले. तसंच कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका असंही सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी फोनवरुन चर्चादेखील केली. यावेळी त्यांनी राज्यातील स्थितीची माहिती घेतली.

गृहमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र पोलीस दल कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यासाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. याआधी समाजकंटक, गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सामाजिक एकोपा राखण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ, होमगार्ड मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणं पोलिसांची जबाबदारी आहे. कोणीही ते बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. राज्यात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

१५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीसा पाठवण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Exit mobile version