Marathi e-Batmya

जयंत पाटील म्हणाले, आपण हनुमान चालिसा म्हणतोय, अन् तुम्ही त्रास होतोय…

मागील काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालिसा पठणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं दिसत आहे. या मुद्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवि राणा यांनी शिवसेनेवर चांगलेच शरसंधान करण्याचा प्रयत्न सुरु ठेवलेला आहे. यापार्श्वभूमीवर आपल्या मिश्किल टिपण्णीसाठी प्रसिध्द असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राणा दाम्पत्यावर अप्रत्यक्ष टिपण्णी करत चांगलाच निशाणा साधला आहे.

विदर्भ पाटबंधारे विभागातील शेतकऱ्यांचा सांगली येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना एका ग्रामस्थानं गावात माकडांचा उच्छाद मांडल्याची तक्रार मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. त्यावर जयंत पाटील यांनी चांगलीच मिश्किल टिपण्णी केली. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी चांगलाच हशा पिकला. तसेच या कार्यक्रमाचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत असल्याचे दिसून आले.

आसपासच्या एका गावातील एका ग्रामस्थानं जयंत पाटील यांच्यासमोर माकडांचा त्रास होत असल्याची तक्रार मांडली. या भागात मोठमोठी झाडं आहेत. पण इथे माकडं दिसत नाहीत आपल्याला. आमच्याकडे झाडं कमी असूनही आमच्या घरांवर एवढी माकडं आहेत की आमच्या घरांवर कौलं राहिलेली नाहीत. त्यामुळे पिकं राहात नाहीत, असं या ग्रामस्थानं जयंत पाटील यांना सांगितले.

वाचा

मात्र, यावर जयंत पाटील यांनी माकडांचं आपल्याला काहीच करता येणार नाही, असं सांगताना केलेली मिश्किल टिप्पणी उपस्थितांमध्ये हशा पिकवून गेली. रामटेकला मंदिरात मी लहानपणी गेलो होतो. तिथे माकडानं माझ्या हातातलं केळ काढून नेले होते. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आता ४०-५० वर्षांत ती अजून वाढली असतील, अशी आठवण त्यांनी सांगितली.

याच आठवणीचा धागा त्यांनी सध्या राज्यात सुरु असलेल्या हनुमान चालीसाच्या राजकारणाशी जोडत ते पुढे म्हणाले की, आता तुम्ही कौलाच्या घराच्या जागेवर सिमेंट-काँक्रीटचं घर बांधण्याची जिद्द ठेवा. कौलाचा आणि माकडाचा त्रास बंद होईल. पण माकडाला काही करू शकत नाही आपण. तो हनुमानाचा अवतार आहे. आपण आता हनुमान चालीसा म्हणतो. आणि तुम्ही म्हणताय ते आपल्याला त्रास देतायत असे सांगताच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला.

सध्याच्या राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसाच्या राजकारणावरून जयंत पाटील यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.

Exit mobile version