Marathi e-Batmya

दहशतवाद्यांविरोधातील सर्जिकल स्ट्राईकचे विधिमंडळाकडून अभिनंदन

मुंबई: प्रतिनिधी

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेले चोख प्रत्युत्तर ही अभिमानाची बाब आहे.  सैन्य आणि वायू दलाने पाकव्याप्त काश्मिरमधील जैश- ए- मोहम्मदच्या तळांवर बॉम्बींग (air strike) करून ते नेस्तनाबुत केले आहे. जगातील मजबूत सैन्य आणि देशापैकी भारत एक देश असल्याचे सैन्याने सिद्ध केले. या यशस्वी कामगिरीकरिता महाराष्ट्राच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्य आणि वायू दलाचे अभिनंदन केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्य आणि वायुदलाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.या ठरावास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला.

मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात दहशतवादांच्या तळावर केलेली कारवाई ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. पुलवामा येथील हल्ल्यात शहिदांचे बलीदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी केंद्र शासनाने सैन्यास संपूर्ण अधिकार दिले होते.

भारत हा कमजोर नसून, जगातील मजबूत सैन्य आणि देशांमध्ये भारत हा एक देश आहे. भारतीय म्हणून ही सर्वांसाठी गौरवाची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्यावतीने सैन्य आणि वायू दलाचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय सैनिकांच्या कामगिरीचे विधानपरिषदेतही अभिनंदन

भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईला पाठिंबा देणारा अभिनंदन प्रस्ताव विधानपरिषदेत एकमताने संमत करण्यात आला. सभागृह नेते तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा अभिनंदन प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, बाबाजानी दुर्राणी, जयंत पाटील, हेमंत टकले यांनी या प्रस्तावास पाठिंबा देत भारतीय सैनिकांच्या कामगिरीचे कौतुक केले.

Exit mobile version