Marathi e-Batmya

शरद पवार यांची ठाणे महापालिका हॉस्पीटल प्रशासनाला कानपिचक्या

ठाणे शहर हे तसे पाह्यला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात कोणती विकास कामे व्हावी आणि कोणती प्रलंबित ठेवायची याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीनेच होत आहे. त्यातच ठाणे महानगरपालिकेवरही मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाचीच सत्ता आहे. पण काही दिवसांपूर्वी येथील महापालिका रूग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नुकतेच एका रात्रीत १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने रूग्णालयाच्या एकंदरच प्रशासन आणि डॉक्टरांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी याबाबत दु:ख व्यक्त करत प्रशासनाला कानपिचक्या दिल्या आहेत.

शरद पवार यांनी ट्विट करत कोपरी येथील छत्रपती शिवाजी रूग्णालयात काल रात्रभरात १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे सांगत गेल्या काही दिवसांपूर्वी येथील रूग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रूग्णालयाच्या प्रशासनाला जाग आली नाही ही अतिशय दुर्देवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी असून सहवेदना व्यक्त करतो मृत व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण केली.

एखाद्या महापालिका रूग्णालयात इतक्या मोठ्या प्रमाणावर रात्रीत मृत्यू होण्याची घटना ही राज्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. विशेष म्हणजे याच ठाणे महापालिकेवर वर्षानुवर्षे सत्ता गाजविणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

Exit mobile version