Marathi e-Batmya

५० हजार शिक्षकांच्या भरतीप्रक्रियेला येत्या शुक्रवारपासून होणार सुरुवात

जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या भरतीचा प्रश्न सुटला असून शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी पवित्र ही वेबसाईट शुक्रवारपासून कार्यरत होणार आहे. तर त्यानंतरच्या पुढच्या १५ दिवसात प्रत्यक्ष भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

संध्याकाळी उशीरा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर कक्षात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना माहिती दिली.

दीपक केसरकर म्हणाले, शिक्षकांच्या राज्यात मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विशेषतः जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या रिक्त पदे आहेत. त्यामुळे अनेक शाळांना एकच शिक्षक असल्याचे आढळून येत आहे. जिल्हा परिषदांच्या रिक्त पदासाठी शुक्रवारपासून पवित्र या संकेतस्थळावर इच्छुकांनी अर्ज भरल्यानंतर १५ दिवसांनी या प्रत्यक्ष भरतीला सुरुवात होणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान पवित्र या संकेतस्थळावर ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांच्या अर्जाचीच छाणणी करून त्यांना संधी देणार असल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात ३० शिक्षकांची भरती होणार तर दुसऱ्या टप्प्यात २० हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

Exit mobile version