Marathi e-Batmya

आदित्य ठाकरेंचा टोलाः गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले, मदतीसाठी दिले नाहीत

राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शेतीच्या शेती वाहून गेलेली असताना राज्य सरकार मात्र उत्सवांमध्ये व्यस्त आहे. ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. अशातच शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली.

आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू असा शब्द आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. या गद्दारांनी खोके केवळ स्वतःसाठी ठेवलेत मदतीला दिले नाहीत, असा प्रहार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

आदित्य ठाकरे गुरुवारी नाशिक येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्या मागण्या, त्यांचं झालेल्या नुकसान याबाबतची माहिती घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पांढुर्ली येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना कोणीही धीर सोडू नका; उद्धव साहेबांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला येथे पाठवले आहे. याशिवाय त्यांनी सरकारवर देखील निशाणा साधला. गद्दारांनी खोके त्यांच्याजवळ ठेवले मदतीला दिले नाहीत. पण आम्हाला राजकारण करायचं नाही. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि याबाबतचा आवाज आम्ही विधानसभेत उठून असा शब्द आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी शिंदे ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी शिंदे ग्रामस्थांनी राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्हाला मदत सोडा, भेटायला पण मुख्यमंत्री आले नाहीत, असं गाऱ्हाणं या ग्रामस्थांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे मांडलं.

Exit mobile version