Marathi e-Batmya

उदय सामंत यांची माहिती, गट ड मधून पदोन्नती संदर्भात तीन वर्षांची अट करण्याबाबत शासन सकारात्मक

ठाणे महानगरपालिकेत गट ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी असलेली पाच वर्षांची अट तीन वर्षांवर आणण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सांगितले.

सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी नियम ९७ अन्वये या विषयी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थितीत केली होती.

ठाणे महापालिकेमध्ये गट ‘ड’ च्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भातील विषयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली असल्याचे सांगत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि अकोला महानगरपालिकांमध्ये पदोन्नतीसाठी तीन वर्षांचा निकष लागू आहे. त्याच धर्तीवर  तीन वर्षाची निमित सेवा पूर्ण केलेल्या व पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांना अन्य महानगरपालिकाप्रमाणे वर्ग तीन मध्ये पदोन्नती देण्यासाठी निर्णय घेतला जाईल. यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून सर्वसाधारण सभेचा ठराव प्राप्त झाल्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल असेही सांगितले.

अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगत मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, पात्र कुटुंबीयांना वेळेत न्याय मिळणे आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिकेतील भरती प्रक्रियेत ठाणे शिक्षण मंडळमध्ये प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्त्वावरील प्रकरणांचा समावेश करण्याबाबतही  सूचित केले जाईल.

Exit mobile version