महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रोब्लम ऑफ रुपी या प्रबंधावर आधारित रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईतील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. येत्या १ एप्रिल रोजी रिर्झव्ह बँकेला ९० वर्ष पूर्ण होत आहेत त्या पार्श्वभुमीवर ही भेट घेतली.
भारतीय रुपयाचे मूल्य वाढले पाहिजे. रुपयांचे अवमूल्यन थांबविले पाहिजे. भारताची अर्थव्यवस्था आज जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. ती पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ही पर्यत्न केले पाहिजे अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गर्व्हनर संजय मल्होत्रा यांना केली. त्यावर भारतीय रुपया हा जागतिक चलन व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन गर्व्हनर संजय मल्होत्रा यांनी दिले.
रिझर्व्ह बँकेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली. रिझर्व्ह बँकेतील सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न आपण प्राधान्याने सोडवू असे आश्वासन गर्व्हनर संजय मल्होत्रा यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकसनशील देश म्हणुन प्रगती करीत आहे.जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावार आहे.भारतीय रुपयांचे मूल्य जागतिक बाजार पेठेत वाढले पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदीच्या नेतृत्वात आम्ही कार्यरत आहोत. रिझर्व्ह बँकेने आपल्या पध्दतीने प्रयत्न करुन भारतीय रुपयांचे मुल्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. यावर उभयतांमध्ये चर्चा झाली.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस माजी मंत्री अविनाश महातेकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे, ॲड बी. के. बर्वे, वामन आचार्य; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, दिलीप जगताप, घनश्याम चिरणकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
