Marathi e-Batmya

‘वंदे मातरम’ गीत सार्ध शताब्दी महोत्सवाच्या लोगो डिझाईन स्पर्धेला सुरुवात

थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या भारतमातेच्या राष्ट्रगीताला येत्या ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वंदे मातरम गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवाच्या लोगो डिझाईन स्पर्धेला सुरुवात झाली आहे.  ‘वंदे मातरम्’ हे गीत देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक असून आजही ‘वंदे मातरम्’ ऐकताना भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते या महान साहित्य कृतीला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सार्ध शताब्दी महोत्साच्या अंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. या महोत्सवाचा लोगो जनतेतुन तयार व्हावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की, वंदे मातरम गीताला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य या गीतात आहे. भारतमातेच्या या राष्ट्रगीताचा गौरव जनतेच्या उत्सुर्फ सहभागाने झाला पाहिजे . त्यामुळे आपले मित्र परिवार, संघटना,  शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच  सामाजिक माध्यमांवर या ऐतिहासिक सोहळ्याला व्यापक रूप देण्याचा आमचा प्रयत्न असून  या सार्ध शताब्दी महोत्सव स्पर्धेत सर्वानी सहभाग घ्यावा असे आवाहनही केले.

पुढे बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, यात  भाग घेण्यासाठी surl.lu/nmqcfx या लिंकवर क्लिक करावे लागणार आहे. तसेच विशिष्ट क्यूआर कोडवर स्कॅन करावे लागणार आहे. स्पर्धेची अंतिम तारीख १० सप्टेंबर असणार आहे.

शेवटी बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, “राज्यातील कौशल्य विद्यापीठ, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. राज्यातील  प्रत्येक तालुक्यात ५ हजारहून अधिक देशप्रेमींसोबत  सार्ध शताब्धी  महोत्सव साजरा होणार असून त्याची रुपरेषा  लवकरच  जाहीर करण्यात  येईल. त्यासंदर्भात ६ शासकीय आणि ७ अशासकीय सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलीय. प्रतिष्ठित व्यक्तींचा त्यात समावेश करण्यात आलाय”, अशी माहितीही दिली.

Exit mobile version