Marathi e-Batmya

राहुल गांधी यांच्या लेखातील आरोपावर निवडणूक आयोग म्हणते, प्रतिकूल निकाल…बदनामी

देशातील लोकसभा निवडणूकीनंतर सहाच महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणूकीत जाहिर झालेल्या आकडेवारीपासून ते भाजपाला मिळालेल्या विजयाबाबत सर्वत्र आश्चर्य सर्वचस्थरातून व्यक्त करण्यात आले. याशिवाय अनेक गोष्टींबाबत संशय व्यक्त करण्यात येवू लागला. यासंदर्भात काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अनेक विषयांबाबत माहिती मागितली.

पण त्याबाबत निवडणूक आयोगाकडून काँग्रेस पक्षाला मागितलेली माहिती अद्याप दिली नाही. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कशी फिक्सिंग झालेली होती याविषयी एक खास लेख लिहिला. मात्र लेखाच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपावर निवडणूक आयोगाने टीका करत प्रतिकूल निर्णयामुळे निवडणूक आयोगाची बदनामी करणे पूर्णपणे मुर्खपणाचे असल्याचे प्रत्युत्तर दिले.

तसेच भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) सूत्रांनी शनिवारी (७ जून, २०२५) गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरीचे दावे फेटाळून लावले आणि मतदारांकडून प्रतिकूल निकाल मिळाल्यानंतर त्यांची बदनामी करणे हे पूर्णपणे मूर्खपणाचे असल्याचे म्हटले.

माजी काँग्रेस अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र राज्य निवडणुकीत “मॅच फिक्सिंग” झाल्याचा आरोप केलेल्या लेखाला उत्तर देताना निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी सांगितले की, कोणीही चुकीची माहिती पसरवल्याने निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी होते आणि या महाकाय कामासाठी अथक परिश्रम करणाऱ्या लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होत असल्याची सारवासारवही केली.

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी असे निदर्शनास आणून दिले की, महाराष्ट्राच्या मतदार यादीवर उठवले जाणारे निराधार आरोप असून कायद्याच्या राज्याचा अपमान असल्याचा दावाही केला आहे.

Exit mobile version