Marathi e-Batmya

मोदींचे फाळणी विषयीचे ते ट्विट पंतप्रधान म्हणून की भाजपाचे नेते म्हणून?

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी

मागील सात वर्षापासून देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत वैयक्तीक खात्यावरून वादंग निर्माण होईल असे कोणतेही ट्विट केले नाही. तसेच त्यांच्या पीएमओ खात्यावरून करण्यात आलेली भाषणे किंवा आवाहन हीच त्यांची अधिकृत भूमिका मानली जात असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १४ ऑगस्ट रोजीचे औचित्य साधत भारत-पाकिस्थान फाळणीवेळी झालेल्या रक्तपाताच्या घटनांना उजाळा दिला. मात्र ते ट्विट मात्र त्यांनी पीएमओच्या खात्यावर करण्याचे टाळल्याने मोदींचे ते ट्विट भाजपा नेता म्हणून की देशाचे पंतप्रधान म्हणून केले याबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

ब्रिटीशांनी भारत आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य देताना १४ ऑगस्ट १९४७ ला पाकिस्तानला स्वातंत्र्य देश म्हणून घोषित केले तर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले. भारत-पाकिस्तान फाळणीच्या दरम्यान भारतातून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या आणि पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या अनेक हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली होवून मोठ्या प्रमाणावर रक्तपाताच्या घटना घडल्या. या दु:खातून मागील काही वर्षात भारत आणि पाकिस्तानकडून सावरत मागे टाकण्याचा प्रयत्न या दोन्ही देशांकडून करण्यात आला. विशेषत: पंतप्रधान स्व.अटबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळासह काँग्रेसने या कटू आठवणी नेहमीच विसरण्याचा प्रयत्न झाला.

मात्र भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना आणि रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “फाळणी दरम्यानच्या काळात झालेल्या घटनांचे दु:ख आपण विसरू शकत नसल्याचे सांगत एकमेकांप्रती असलेला तिरस्कार आणि हिंसेमुळे आपल्या बहिणी आणि भावांना स्थलांतरीत व्हावे लागले तर काहींना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या संघर्ष आणि बलिदानानिमित्त १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका दिवस (partition horrors remembering day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस भेदभाव शत्रुत्व आणि द्वेष भावनेचे विष संपविण्यासाठी सतत प्रेरीत करेल तसेच एकता, सामाजिक सद्भाव आणि मानवी जाणीवा अधिक मजबूत करेल” असे ट्विट केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या भावना या भाजपाचा हिंदू कार्यकर्ता म्हणून केलेल्या आहेत की भारताचे पंतप्रधान म्हणून केले हे कळायला मार्ग नाही.

त्यांच्या या ट्विट मध्ये ज्या दुर्घटनांमधून हिंदूंना जावे लागले, त्याच दुर्घटनांमधून मुस्लिम समुदायालाही जावे लागले. तरीही पंतप्रधान मोदी यांनी मुस्लिम समुदायाचा एकाही शब्दाने उल्लेख केला नाही, की देशातील मुस्लिम समुदायाबद्दल आणि त्यांच्या विरोधात होत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत एका चकार शब्दाने उल्लेख केला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मागील आठवड्यात इंडिया सेव्ह या संघटनेच्या नावाखाली काही हिंदूत्ववादी लोकांनी थेट मुस्लिम समुदायाचे नाव घेत त्यांना भारत छोडो पाकिस्तान जावो अशा घोषणा देत संसदेच्या परिसरात आंदोलन केले. तर उत्तर प्रदेशमध्ये एका मुस्लिम कुटुंबियाला धर्म स्विकारण्यासाठी २० हजार रूपयांची लालच दिल्याच्या खोट्या आरोपावरून त्यांना मारहाण करत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूका जवळ येत असून त्या पार्श्वभूमीवर तर पंतप्रधान मोदी यांनी तर हे ट्विट केले नाही ना अशी चर्चाही राजकिय आणि सामाजिक क्षेत्रात सुरु झाली आहे.

मोदींचे हेच ट्विट:-

Exit mobile version