Marathi e-Batmya

आरएसएस प्रमुख डॉ मोहन भागवत यांच्यावर अपक्ष खासदार कपिल सिबल यांची टीका

राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी रविवारी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली. भागवत यांनी अमेरिकेत ‘विविधतेतील एकता भारताच्या डीएनएमध्ये आहे’ असे वक्तव्य केले होते. त्यावर कपिल सिबल म्हणाले की, शब्दांना महत्त्व नाही, कृती बोलली पाहिजे. अपक्ष खासदार आणि ज्येष्ठ वकील असलेल्या कपिल सिबल यांनी सांगितले की, भागवत यांची टिप्पणी देशांतर्गत या विषयावरील मौनाच्या विरोधात आहे.

भागवत यांनी शनिवारी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील इन्फोसिस थिएटरमध्ये झालेल्या एका रॅलीत ६,००० हून अधिक भारतीय-अमेरिकन समुदायाचे सदस्य आणि आंतरधर्मीय नेत्यांना संबोधित करताना ही टिप्पणी केली होती. आपल्या भाषणात डॉ मोहन भागवत म्हणाले की, विविधतेचा उत्सव साजरा केला पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे आणि ती स्वीकारली पाहिजे. तसेच त्यांनी ‘विविधतेतील एकते’ची कल्पना भारताच्या अस्मितेशी जोडली.

भाषणावर प्रतिक्रिया देताना कपिल सिबल यांनी एक्स वाहिनीवर म्हटले, भागवत न्यूयॉर्कमध्ये म्हणाले: ‘विविधता ही आपल्या जन्मजात एकतेची शोभा आहे. तिचे रक्षण केले पाहिजे’. परदेशात शहाणपणाचे बोल, देशात मौन. शब्दांना महत्त्व नाही, कृतीनेच बोलले पाहिजे!” ते म्हणाले की डॉ मोहन भागवत यांचे विधान म्हणजे “परदेशात शहाणपणाचे बोल” पण “देशात मौन” असे आहे.

अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग (AHEAD) फोरमने आयोजित केलेल्या ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’मध्ये बोलताना डॉ मोहन भागवत म्हणाले, “जेव्हा आपण अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणतो, तेव्हा अनेकदा एका शब्दावर चर्चा होते, तो म्हणजे बहुलवाद. आणि जेव्हा आपण भारत म्हणतो, तेव्हा दुसऱ्या एका वाक्यांशावर चर्चा होते: विविधतेतील एकता,” यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

डॉ मोहन भागवत म्हणाले की एकता आणि विविधता दोन्ही भारताच्या डीएनएमध्ये आहेत आणि त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या संदेशाचा संदर्भ दिला की प्रत्येक राष्ट्राला एक ध्येय साध्य करायचे असते आणि एक नियती पूर्ण करायची असते. “भारताला काय नियती दिली आहे? विविधतेतील ही एकता स्वतः अनुभवण्यासाठी आणि वेळोवेळी जगाला तिची जाणीव करून देण्यासाठी भारताची निर्मिती झाली आहे. आपण एक आहोत आणि याच विविधतेमुळे आपले हे ऐक्य अधिकच खुलून दिसते,” असे ते म्हणाले.

आपल्या जवळपास तासभराच्या भाषणात डॉ मोहन भागवत म्हणाले, “विविधतेचा उत्सव साजरा केला पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे, तिला स्वीकारले पाहिजे आणि त्याच वेळी आपण एकत्वाची ही भावनाही लक्षात ठेवली पाहिजे. ही एक अत्यंत खरी भावना आहे.”

Exit mobile version