देवगडः प्रतिनिधी
राज्यातील शहरांबरोबर गावे ही विकासित व्हावीत या उद्देशाने राज्य सरकारकडून स्मार्ट गावांची योजना जाहीर केली. या योजनेत पहिली ग्रामपंचायत म्हणून देवगड तालुक्यातील बापर्डे ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. परंतु या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक शिवराज राठोड, सरपंच श्रीकांत नाईकधुरे यांनी संगनमताने गावात विकासकामे न करताच ५० लाखाहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून मनरेगा योजनेतही भ्रष्टाचार केल्याचे मंगेश वेद्रुक यांनी माहिती अधिकारातून उघडकीस आणले आहे.
बापर्डे ग्रामपंचायतीच्या हद्दीत जुवेश्वर, बापर्डे ही दोन गावे येतात. या दोन गावांमध्ये १२ वाड्या आहेत. या वाड्यामध्ये जाण्या-येण्यासाठी प्रामुख्याने रस्ते, पायवाट, बंधारे, पाण्याची पाईपलाईन, पूल आणि रस्त्याचे काँकेटीकरणाच्या कामे न करताच त्यासंदर्भातील बीले अदा करण्यात आलीत. तसेच त्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर निविदाही मागविण्यात आलेल्या नव्हत्या. विशेष म्हणजे विकास कामांची बिले अदा करताना ती बहुतांष वेळा व्हॉऊचरवरच संबधित ठेकेदारास अदा करण्यात आली आहेत. तर यातील अनेक व्हॉऊचरवर पैसे अदा केल्याची तारीखच टाकण्यात आलेली नसल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून आल्याचे वेद्रुक यांनी सांगितले.
विशेष म्हणजे माजी सरपंच श्रीकांत नाईकधुरे हे २०१२ पासून ग्रामपंचायतीत सरपंच पदावर सातत्याने निवडूण येत होते. ग्रामपंचायतीच्या सदस्यपदीही त्यांच्याच मर्जीतील सदस्य आहेत. या सदस्यांचाही त्यांना पाठिंबा दिला असल्याने ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चालविण्यात येत आहे. या सदस्यांच्या भ्रष्ट कारभाराला येथील स्थानिक जनताही कंटाळली असल्याची कैफीयत त्यांनी मांडली.
याशिवाय मनरेगा अंतर्गत कामे करण्यात आल्याचे बापर्डे जुवेश्वर ते गवळदेव रस्ता(२०१२-१३), बापर्डे कवटाळवाडी ते महालक्ष्मी मंदीर रस्ता (२०१२-१३), बापर्डे-रेडेटाका ते धनगरवाडी (२०१६-१७) या कालावधीत रस्ते बांधणीचे काम पूर्ण करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. त्यासाठी स्थानिक नागरीकांना रोजगार देण्यात आल्याचे दाखविण्यात आले. मात्र या प्रत्यक्षात यातील २०१२-१३ साली बांधण्यात आलेली रस्त्याची कामे अपूर्णच राहीलेली प्राप्त परिस्थितीवरून दिसते. तर बापर्डे-रेडेटाका ते धनगरवाडी २०१६-१७ रस्त्याच्या कामाचा नियोजित कालावधी संपलेला असतानाही ३ दिवस वाढीव दाखविण्यात आले. तसेच या तीन दिवसाचा रोजगार कामगारांच्या नावावर दाखवून तो निधीही गायब करण्यात आल्याचा आरोप त्यांनी करत या रस्ते बांधणीवर किती खर्च झाला याची माहितीही माहिती अधिकारात ग्रामपंचायतीने अद्याप उपलब्ध करून दिलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात सातत्याने माहिती मागत असल्याने ग्रामपंचायत सदस्य तथा सरपंचाचे समर्थक असलेल्या ग्रामपंचायत सदस्य विश्वास सहदेव धुरे यांनी ७ फेब्रुवारी २०१९ रोजी त्याच्या अन्य एका साथीदाराच्या मदतीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले.
पहिल्या स्मार्ट ग्रामपंचायतीतच ५० लाखांहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार
