Marathi e-Batmya

हवामान खात्याने दिली आनंदाची बातमी; केरळात तीन दिवस आधीच मान्सून

मागील काही दिवसांपासून वाढत्या उन्हाच्या काहीलीमुळे महाराष्ट्रासह देशभरातील जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे कधी होते मान्सूनच्या पावसाचे आगमन याची उत्सकुता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागल्याने किमान काही काळ तरी हवेत गारवा निर्माण होतो. परंतु यंदा मान्सून पूर्व पावसाने पाठ फिरवली.

त्यामुळे सुर्याच्या उष्ण किरणांनी चांगलीच काहीली निर्माण केली. यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने एक आनंदाची बातमी दिली असून तीन दिवस आधीच मान्सूनचे आगमन केरळात दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही लवकरच मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अंदमान समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात आगमन केल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतली. नैऋत्य मोसमी वाऱ्यांमध्ये दोन दिवस काहीच प्रगती झाली नव्हती. त्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी संथगतीनं आगेकूच केली. दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये आगमन करेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. पण तीन दिवस आधीच केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे.

केरळमध्ये मान्सूनने आगमन केल्यानंतर हवामान खात्याने आता दक्षिणेकडील काही राज्यांत पावसाचा इशारा दिला आहे. येत्या काही तासांत याठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरवर्षी केरळमध्ये १ जूनला मान्सूनचं आगमन होतं. पण यंदा तीन दिवस आधीच मान्सून दाखल झाला.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील मार्गक्रमणासाठी सध्या पोषक हवामान तयार झालं आहे. येत्या काही दिवसांत मध्य अरबी समुद्र, केरळातील उर्वरित भाग, तामिळनाडू, कर्नाटक आणि दक्षिण मध्य बंगालच्या उपसागरात देखील मान्सूनचं आगमन होणार आहे. येत्या तीन ते चार दिवसात ईशान्य भारतातील काही राज्यात देखील मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान दक्षिणेकडील काही राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली.

दक्षिणेतील राज्यात मान्सूनच्या आगमनाबरोबर महाराष्ट्रातही मान्सूनची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उन्हाळ्यामुळे तापलेले वातावरणात गारवा निर्माण होवून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यातच शेतकरी वर्गालाही दिलासा मिळणार आहे. सध्या तरी मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात कधी होणार याबाबतचे भाकित हवामान खात्याने सध्या जरी केलेले नसले तरी सर्वसाधारणत: केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर आठवडाभरात महाराष्ट्राही मान्सून दाखल होत असल्याचे आतापर्यत दिसून आले आहे.

Exit mobile version