Marathi e-Batmya

दत्तात्रय भरणे यांचे आदेश, वादळी पावसातील नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा

राज्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे २४ जिल्ह्यात अंदाजे १ लाख ५०० एकराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळण्याच्यादृष्टीने बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीने मदत करण्यात येईल, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

दत्तात्रय भरणे यांनी आज इंदापूर तालुक्यातील वडापुरी, सुरवड, गणेशवाडी, बावडा, टणू, पिंपरी बु. आणि लाखेवाडी भागात झालेल्या नुकसानीबाबत प्रत्यक्ष बांधावर जाणून पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांनाही यावेळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार जीवन बनसोडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे आदी उपस्थित होते.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, हवामान बदलामुळे आलेल्या राज्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत; बाधित क्षेत्रातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. अशा परिस्थितीत कृषी विभागाने विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांनी खचून जावू नये, राज्य शासन आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे, असेही सांगितले.

शेवटी बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळात मंजूरी देण्यात आली आहे; या योजनेचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यापुढे शेतकरी कर्जबजारी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही सांगितले.

Exit mobile version