सौरऊर्जा निर्मितीमध्ये जागतिकस्तरावर महत्त्वाची भूमिका असलेल्या एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पादन संकुल नागपूर येथे वारी एनर्जिज माध्यमातून उभारण्यात येत आहे. भारतातील सर्वात मोठी १० गिगावॅट क्षमता असलेला हा प्रकल्प सौर क्षेत्रासाठी अधिक स्थिर देशांतर्गत पुरवठा यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे सौरऊर्जा निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवी ओळख निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात वारी एनर्जीज लिमीटेड या आघाडीच्या उद्योग समूहातर्फे भारतातील सर्वात मोठ्या १० गिगावॅट एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पादन प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी अर्थ व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वारी एनर्जीचे अध्यक्ष हितेशभाई दोशी, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार समीर मेघे, माजी खासदार अजय संचेती, वारी एनर्जीजचे विरेंद्र दोशी, अंकित दोशी, करण दोशी तसेच उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन मुख्यमंत्र्यांचे मुख्य गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
भारताच्या ऊर्जा सुरक्षितता व उत्पादन स्वालंबीत्वामधील महत्त्वाचा टप्पा असलेला वारी एनर्जीज हा प्रकल्प सहा हजार २०० कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह ३०० एकर जागेवर विकसित होत आहे. या प्रकल्पामुळे दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या संपूर्ण प्रकल्पामध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून संपूर्ण क्षमता निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.
एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पादन यापूर्वी चीनमध्ये होत असून या प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर येथे उत्पादनाला सुरुवात होणार आहे. चीन नंतर जगातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून निर्यात क्षेत्रातही नावलौकिक असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ७ प्रकल्प मंजूर केले असून त्यापैकी ४ प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी ३ प्रकल्पांचे भूमिपूजन झाले आहे. महाराष्ट्र १ ट्रिलीयन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करतांना औद्योगिक विकासाला प्राधान्य देत असल्यामुळे दावोस येथे राज्यात गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने तयार केलेल्या मुख्यमंत्री सौर योजनेच्या माध्यमातून १६ हजार मेगावॅट क्षमता पूर्ण करण्यासाठी वेगाने कार्यवाही सुरू असून आतापर्यंत ५ हजार मेगावॅट वीजनिर्मिती झाली असून सर्व शेतकऱ्यांना सौरऊर्जा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, थर्मल पॉवरमुळे निर्माण होणारे पप्रदूषण टाळण्यासाठी ३०० कोटीपेक्षा जास्त झाडे लावावी लागतील. परंतु सौरऊर्जेच्या माध्यमातून प्रदूषण व पर्यावरण संतुलित ठेवण्यास मदत होणार आहे. सौरऊर्जेच्या निर्मितीमुळे वीजदर ९ टक्क्यांनी कमी होणार असून सौरऊर्जेने संपूर्ण जगभरात क्रांती केली असल्याचे यावेळी सांगितले.
प्रारंभी वारी एनर्जीज लिमिटेडच्या भारतातील सर्वात मोठ्या १० गिगावॅट एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पादन प्रकल्पाच्या पायाउभारणीचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा असलेली विशेष सोलर फोटोफ्रेम प्रकल्पाचे अध्यक्ष हितेशभाई दोशी यांनी प्रदान केली.
वारी एनर्जीजचे प्रमुख हितेशभाई दोशी यांनी स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात अकोला जिल्ह्यात वारी येथून प्रेरणा घेऊन या उद्योग समूहाची सुरुवात केली असून या उद्योग समूहाद्वारे २५ देशात निर्यात होत आहे. तसेच १० हजारपेक्षा जास्त प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून ९३ हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती होत आहे. मुख्यमंत्री महोदय यांच्या पुढाकाराने अल्पावधीत प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात ६ हजार २०० कोटी रूपयांची गुंतवणूक होणार आहे. भविष्यात ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून येत्या १८ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
