अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीतून असंख्य रूग्णांना आपल्या व्याधीपासून मुक्त होण्यास मदत झाली आहे. तेवीस-चोवीस वर्षांपूर्वी मी स्वतः पाठदुखीने त्रस्त असताना या उपचार पद्धतीने मला तंदुरुस्त होता आले. या ज्ञानशाखेच्या विस्तारासाठी व याचे शैक्षणिक मार्ग वृद्धींगत व्हावेत, या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील असून शासकीय पातळीवर कोठेही कमतरता पडणार नाही, अशी निःसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंन्शन सेंटर येथे आयोजित नॅशनल कॉन्फरन्स ऑन अॅक्युपंक्चर अॅक्यूकॉन २०२६ च्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी महाराष्ट्र काऊन्सील ऑफ अॅक्युपंक्चरचे डॉ. रूमी बेरामजी, इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अक्युपंक्चर या संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमण कपूर यांच्यासह डॉ. नारायण नवले आणि डॉ. प्रदीप गुहा आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, सिईंग इज बिलिव्हींग अर्थात आपण प्रत्यक्ष जे डोळ्याने पाहतो, त्यावर विश्वास दृढ करतो. अॅक्युपंक्चर उपचार पद्धती ही अशीच अनुभूतीची उपचार पद्धती आहे. या सर्वसमावेशक उपचार पद्धती अंतर्गत आपण ही उपचार पद्धती महत्त्वाची मानली आहे. या क्षेत्रापुढे असलेल्या अडचणींची जाणीव असून शासनाच्या वतीने पूर्ण क्षमतेने या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ज्ञानशाखेला, उपचार पद्धतीला प्रतिष्ठा व शैक्षणिक मान्यता देण्यात दिलेले योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. वेळोवेळी त्यांनी आमची भूमिका समजून घेत शासनस्तरावर असलेल्या अडचणी दूर केल्या असून त्यांच्या सहकार्यानेच महाराष्ट्रात ४ हजार ५०० पेक्षा अधिक नोंदणीकृत तज्ज्ञ अक्युप्रेशरची सेवा देत आहेत. यात साठ टक्के संख्या ही महिलांची असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे डॉ. रूमी बेरामजी यांनी यावेळी सांगितले. डॉ. रमन कपूर यांनीही मनोगतात शासनाच्या योगदानाला अधोरेखित केले.
