बर्मा शेल रेल्वे लाईन लगतच्या राजीव गांधी नगर, इंदिरा नगर, सुमन नगर आणि चिखलवाडी येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य शासनाच्या विहित धोरणानुसार या झोपडीधारकांचे पुनर्वसन करावे आणि पात्रतेची छाननी पूर्ण होईपर्यंत कोणतीही निष्कासन कारवाई स्थगित ठेवावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.
खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रेल्वेला पाठवलेल्या पत्रात पुढे म्हणतात की, २०१९ मध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण आणि २०२२ मध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करूनही, अद्याप पात्रतेबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. याऐवजी, सन २०२३ पासून येथील रहिवाशांना सतत निष्कासनाच्या नोटिसा बजावल्या जात आहेत, ज्यामुळे स्थानिक कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गंभीर विषयावर रेल्वे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. रेल्वे अधिकारी, एमएमआरडीए MMRDA आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही, असेही यावेळी सांगितले.
