Marathi e-Batmya

कोरोना इम्पॅक्टः मंत्रालयात बायोमेट्रीक हजेरी बंद, स्वच्छतेवर भर

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्याच्या कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील कर्मचारी- अधिकाऱ्यांचा कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याच्या उद्देशाने बायोमेट्रीक हजेरी आजपासून बंद करण्याचा निर्णय घेत दर एक तासाला स्वयंचलित पायऱ्या (इस्केलेटर) , काचेच्या भिंती, फरश्यांची स्वच्छता आदी गोष्टींवर प्रशासनाने भर देण्यास सुरु केली आहे.
मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर आदी भागात कोरोनाचे रूग्ण आढळल्यानंतर आणि त्यांच्या संख्येत वाढ होताना दिसू लागल्यानंतर मंत्रालयात संभावित होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना मंत्रालयात प्रवेश बंदी करण्यात आली. तसेच मंत्रालय वगळता विविध शासकिय कार्यालयातून येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
मात्र मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी हे मुंबई शहराबरोबरच उपनगरात रहात आहेत. त्यामुळे त्यांच्या येण्या-जाण्याच्या प्रवासात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यातच काल सोमवारी मंत्रालयात काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने मंत्रालयातील इतर कर्मचाऱ्यांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी कर्मचारी-अधिकाऱ्यांची बायोमेट्रीक हजेरी आजपासून पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय दर तासाला मंत्रालयातील सर्व भागांची स्वच्छता निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version