Marathi e-Batmya

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावीतील शाहूनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा

भाजपा महायुती सरकारचा कारभार अत्यंत ढिसाळ असून सत्ताधारी पक्षातील नेते दादागिरी करत आहेतच पण आता पोलीस प्रशासनातील अधिकारीही दादागिरी करत आहे. पोलीस लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीत. धारावीतील शाहूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेहमत मुल्ला इनायत सय्यद यांनी खासदाराशी व रहिवाशांशी उद्धट वर्तणूक करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे. अशा बेताल व उद्धट पोलीस निरिक्षकावर योग्य ती कारवाई करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली मागणी.

या पत्रात खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणतात की, जास्मिन मिल रोड परिसरातील रहिवासी गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र प्रदूषण, रस्त्यांची दुर्दशा आणि वाढत्या वाहतूक कोंडीचा सामना करत आहेत. मोदानी प्रकल्पाशी संबंधित असलेल्या बांधकामासाठी वापरात असलेल्या जड वाहनांमुळे रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले असून आपत्कालीन सेवाही विस्कळीत होत आहेत. रहिवाशांनी प्रदूषणाबाबत तक्रार केल्यानंतर रस्त्यांवर पाणी शिंपडण्यात आले मात्र त्यामुळे आधीच चिखलमय आणि खराब असलेले रस्ते अधिक धोकादायक बनले. स्थानिक नागरिकांनी बांधकामस्थळी जाऊन संबंधितांना नियमांचे पालन का केले जात नाही, असा जाब विचारला. घटनास्थळी उपस्थित डीआरपी प्रतिनिधींनी नागरिकांना कार्यालयात बोलावून चर्चा केल्याचे सांगितले मात्र त्यानंतर त्यांच्याविरुद्ध कार्यालयात ट्रेस पासिंग आणि नुकसानीचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी धमकी दिली.

वर्षा गायकवाड शेवटी म्हणाल्या की, पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन कारवाई करणे आवश्यक असताना शाहू नगर पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या वागणुकीने धक्का बसला आहे. रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. नागरिकांचे फोन आल्यानंतर मी स्वतः घटनास्थळी गेले. पण वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेहमत मुल्ला इनायत सय्यद यांचे वर्तन अत्यंत उर्मट होते, त्यांची भाषा दादागिरीची होती. हा लोकप्रतिनिधीचा अपमान आहे. लोकप्रतिनिधीशी कसे वागावे याचा त्यांना विसर पडलेला दिसला. प्रश्न विचारणे गुन्हा आहे का असा प्रश्न विचारून अशा बेताल अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली.

Exit mobile version