Marathi e-Batmya

१० वीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेकडून २० गुण मिळणार

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांच्या प्रगती करीता पुन्हा एकदा शालेय अंतर्गत २० गुण देण्याची पध्दत पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्याच्या १०० मार्काची पध्दत बंद करून पुन्हा एकदा ८० लेखी परिक्षेला तर २० हे गृहपाठ, तोंडी परिक्षा, खेळ आदी अंतर्गत पध्दतीला करण्याचे निश्चित करण्यात आले असून यंदाच्या वर्षीपासून १० वीच्या विद्यार्थ्यांना हे गुण देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिली.
हे अंतर्गत गुण मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांबरोबर सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी मिळणार आहेत. त्याचबरोबर ९ वी आणि १० वीची स्वतंत्र परिक्षा होणार असून या दोन्ही परिक्षांचे गुण एकत्रित गृहीत धरण्यात येणार नाहीत. या संबधीचा शासन निर्णय आजच जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठीही अंतर्गत मुल्यमापन पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे. ११ वीच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षापासून २० गुण हे अंतर्गत पध्दतीने देण्यात येणार आहे. मात्र १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसाठी पर्यावरणशास्त्र हा बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामध्ये जलसुरक्षा विषयही समाविष्ट करण्यात आला आहे. याशिवाय या विद्यार्थ्यांची परिक्षा ही ६५० मार्काऐवजी ६०० मार्कांची होणार आहे. परिक्षा मुल्यमापन पध्दतीला हा बदल १२ वी च्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षीपासून लागू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अंतर्गत मुल्यमापन पध्दतीचा पुर्नविचार करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version