Marathi e-Batmya

चंद्रशेखर बावनकुळे यांचा युक्तीवाद,… अजित पवार यांच्यावरील गुन्हे ही कमी झाले

भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. तसेच मोहित कंबोज यांनी कर्ज फेडले नसल्याविषयीच्या काही जाहिराती बँक ऑफ बडौदा आणि अन्य काही राष्ट्रीयकृत बँकांनी प्रसारमाध्यमात दिल्या होत्या. या कथित बँक घोटाळाप्रकरणात सीबीआयनेच कंबोज यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील क्लोजर रिपोर्ट नुकताच न्यायालयात सादर करत क्लीनचीट दिली. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्याकडून भाजपावर टीका केली जात आहे. त्याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, एखादा गुन्हा आकसाने दाखल झाला आणि तपासात काही मिळाले नसेल, त्यामुळे गुन्हा कमी झाला असणार आहे. तसेच मागील काळात अजित पवार यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले होते. काही गुन्ह्यांतील तपासात काहीच आढळले नाही. त्यामुळे त्याच्यावरील गुन्हे कमी झाले असल्याचे सांगत महाविकास आघाडीवर पलटवार करण्याचा लंगडा युक्तीवाद केला.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील खडकवासला आणि शिवाजीनगर येथील भांडारकर इन्स्टिट्यूट टिफीन बैठकीस हजेरी लावत डब्यातील जेवणाचा आस्वाद घेतला. या बैठकीला भाजपाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वाशी त्यांनी संवाददेखील साधला.

त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधताना त्यानी राज्यातील घडामोडी बाबत देखील भाष्य केले.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्या खिशात पेन नव्हता. त्या दरम्यान शिवसेनेचे अनेक आमदार भेटून सांगायचे की, अजित पवार सकाळपासून कामाला सुरुवात करतात. तर आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात येत नाही. आमच्या पत्रावर आणि फाईलवर सहा सहा महिने सह्या होत नाही. त्यामुळे आम्ही ६५ वरून १० वर आल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी आमदाराच्या मनामध्ये ती भावना होती. उद्धवजी आपले ७५ टक्के आमदार नाराज असून त्यांच्याकडे लक्ष द्या, असं त्यावेळी वारंवार त्यांना सांगत होतो. पण उद्धव ठाकरे हे आदित्यच्या प्रेमात पडले होते. तसेच त्यांच्या अलिखित करार झाला होता. २०१९ ते २०१४ पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असा झाला होता. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेना संपवयाची ठरवलं होतं. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री होते. त्या ठिकाणी शिवसेना संपवण्याच काम सुरू होते. त्यामुळे पुन्हा आपण निवडून येऊ की नाही ही भीती शिवसेनेच्या आमदारामध्ये होती. शिवसेनेकडे कोणता चेहरा आहे. या अशा भीतीमुळे सरकार बदलतं. त्यामुळे सत्ता परिवर्तन झालं असल्याची नवा आरोप देखील यावेळी मांडली.

तसेच पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात भाजपा आणि शिवसेना चांगल्या प्रकारे काम करीत आहे. त्यामुळे आगामी काळात आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढणार असून या दोन्ही निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांपेक्षा शिवसेनेच्या उमेदवारांना कसे निवडून आणता येईल यासाठी १०० टक्के ताकद अधिकची लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर जाहिरात वादावर प्रश्न विचारण्यात आला असता बावनकुळे म्हणाले, कोणत्याही कुटुंबात दोन भावांमध्ये मतभेद होत असतात. मात्र युतीमध्ये ये फेव्हिकॉल का मजबूत जोड है आणि सरकारवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगितले.

Exit mobile version