Marathi e-Batmya

विरोधकांच्या संयुक्त बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मोठी घोषणा

भाजपाविरोधी ऐक्य दर्शवण्याकरता संयुक्त विरोधी पक्षांची आज बैठक पार पडली. या बैठकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण या बैठकीत देशभरातील २० हून जास्त विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहिले होते. ही बैठक संपल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तसंच, पुढची बैठक शिमल्यात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, ही अत्यंत चांगली बैठक झाली. सर्वांनी एकत्र चालण्याची सहमती दर्शवली आहे. येत्या काळात सर्व पक्षीयांची आणखी एक बैठक होणार आहे. पुढची रणनीती ठरवण्यासाठी या पुढच्या बैठकीत होणार आहे. एकत्र निवडणूक लढवण्याची सहमती आजच्या बैठकीत झाली आहे, असंही स्पष्ट केले.

तसेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले की, पुढच्या बैठकीत अंतिम रुप घेतलं जाईल. कोण कुठून लढवणार हे या बैठकीत ठरवलं जाईल. सध्या जे शासनमध्ये आहेत ते देशहिताचं काम करत नाहीयत. ते देशाचा इतिहास बदलायला निघाले आहेत. स्वातंत्र्यांच्या लढाईलाही ते विसरतील. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधक एकजूट राहणार आहेत. राज्यातील सरकारवरून आव्हाने निर्माण झाली तर सर्व एकत्र राहणार आहेत.

दरम्यान, विरोधकांच्या संयुक्त बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, नेते राहुल गांधी, के.सी. वेणूगोपाल, राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, डिमकेचे प्रमुख तथा तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, शिवसेना ठाकरे गटाचे उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, तसेच पीडीएफच्या प्रमुख आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, प.बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमुलच्या प्रमुख ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते.

Exit mobile version