Marathi e-Batmya

उध्दव ठाकरेंची न्यायालयात बाजू मांडणारे कपिल सिबल म्हणाले, आयोग केंद्राच्या….

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित सवता सुभा मांडणारे एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ही याचिका प्रलंबित असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेल्या धनुष्य बाण वापरण्यास दोन्ही गटांना मनाई केली. उध्दव ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मात्र टीका करत निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप करत चिन्ह गोठविले नाही तर देशातील लोकशाहीच गोठविली असल्याची टीका केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर कपिल सिबल यांनी ट्विट करत वरील टीका केली आहे.

कपिल सिबल ट्विट म्हणतात, निवडणूक आयोगाने फक्त शिवसेनेचं नाव आणि चिन्हंच गोठवलं नाही, तर देशातील लोकशाहीदेखील गोठवली आहे. ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आहे. तर, संधीसाधू लोकांचा शिंदे गट हा भाजपाची सेवा करणारा गट आहे, अशी तिकट प्रतिक्रियाही व्यक्त केली.

निवडणूक आयोग हे फक्त स्वतंत्र असल्याचं दाखवते. मात्र, ते केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात, अशा संस्थेची लाज वाटते, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, निवडणूक आयोगाने काल ‘धनुष्यबाण’ चिन्ह तात्पुरते गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही नवी निशाणी देण्यात येणार आहे. याबरोबच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही, असेही आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version