विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महायुतीला सत्तेत पुन्हा एकदा स्थान मिळावे याकरिता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली. मात्र निवडणूक होताच माझी लाडकी बहिण योजनेच्या मानधनात वाढ होणार की नाही यावरून शंका उपस्थित करण्यात येऊ लागल्या. त्याचबरोबर ही योजना अशीच पुढे राहणार का कि त्यातही छाणनी करण्यात येणार का यासह अनेक अटकळींवर चर्चेला उधाण आले. मात्र या सर्व प्रश्नांवर बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्टच मांडली.
यावेळी बोलताना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, सरसकट कोणत्याही अर्जांची छाननी होणार नाही. उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. चारचाकी महिला अपात्र ठरतील, आंतरराज्य विवाह केलेल्या महिला पात्र ठरणार नाहीत, तसेच आधार कार्डवरील नावापेक्षा बँकेत वेगळे नाव असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबधित महिला अपात्र ठरणार असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना आदिती तटकरे पुढे बोलताना म्हणाल्या की, या योजनेसाठी जुलै महिन्यापासून राज्यातून २ कोटी ६३ लाख अर्ज आले होते. त्यापैकी २ कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले. १२ लाख ८७ हजार बहिणींचे बँक खाते आधार कार्डशी जोडले गेले नव्हते. त्यामुळे त्या महिलांना निवडणूकीपूर्वी लाभ मिळू शकला नाही. दोन कोटी ३४ लाख बहिणींना ऑक्टोंबर-नोव्हेंबर पर्यंतचे प्रत्येकी १५०० रूपये प्रमाणे ७ हजार ५०० रूपये मिळाले आहेत. तर डिसेंबरचा लाभ देण्यासाठी १ हजार ४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. असेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, एकदाही लाभ न मिळालेल्या १२ लाख ८७ हजार बहिणींना सहा महिन्याचे मिळून एकूण ९ हजार रूपये जमा करण्यात आलेले आहेत. राज्यातील लाभार्थी महिलांनी केलेल्या मतदानामुळेच राज्यात महायुतीचे सरकार आल्याचेही यावेळी सांगितले.
