Marathi e-Batmya

आता तिसऱ्या लाटेलाही भाजपा कारणीभूत ठरणार

मुंबई: प्रतिनिधी

जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. देशभर यात्रेच्या नावाखाली गर्दी जमवली जात आहे. दुसऱ्या लाटेच्यावेळी निवडणुकीसाठी अफाट गर्दी जमवल्याने हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला याला भाजपा कारणीभूत होती ही सत्य परिस्थिती आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.

आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओ व या क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी गर्दी टाळली नाही तर तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप गर्दी जमवत आहे. राज्यातही राजकीय कार्यक्रम होत आहेत. या राजकीय कार्यक्रमामुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होत आहे. राज्यसरकारने तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन होत असेल तर निश्चितरुपाने गुन्हा दाखल करुन कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूका येत – जात राहतील परंतु लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत हे भाजपच्या लोकांना कळले पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला.

यापूर्वीच केंद्र सरकारने आणि तज्ञांनी महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचा इशारा दिलेला असताना  जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने भाजपाकडून कोरोनाचे नियम पायदळी तुडवून गर्दी केली जात आहे. तसेच शहरांमध्येही आणि ग्रामीण भागात भाजपाचे नवे मंत्री फिरताना कोरोनाची पुरेशी काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच यापूर्वीही भाजपाने विविध प्रश्नी आंदोलन करताना कोरोना नियमांना फाटा दिला होता. त्यामुळे दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचे अटकळ काही जणांकडून बांधण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व आले आहे.

Exit mobile version