Marathi e-Batmya

न्यायालयाच्या निकालानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, उत्साहात या, शिस्तीने या पण गालबोट…

शिवसेनेतील बंडानंतर परंपरागत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर आणि पक्षावर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला. यापैकी शिवसेनेवरील दाव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर याचिका प्रलंबित आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नसला तरी शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा घेण्याबाबत मुंबई महापालिकेकडून नकारघंटा कळविल्यानंतरही मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाला धक्का देत उध्दव ठाकरे यांच्या गटाला दसरा मेळावा घेण्यास परवानगी देत असल्याचा मोठा निकाल दिला. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उध्दव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसैनिकांनाही आवाहन केले.

उध्दव ठाकरे म्हणाले, विजयादशमीच्या दिवसी जो मेळावा होणार आहे. त्यासाठी आज आपल्याला विजय मिळाला आहे. न्यायदेवतेवर जो आपला विश्वास होता. तो आज सार्थकी ठरला आहे. मी आज तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की, या दसरा मेळाव्याला उत्साहात या, शिस्तीने या, या आनंदाला गालबोट लागेल असं कोणतेही कृत होऊ देऊ नका. इतर काय करतील माहिती नाही. या मेळाव्याकडे जगाचे लक्ष लागले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

न्यायालयाने सांगितल्या प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ही जबाबदारी ते पाडतील, असा मला विश्वास आहे. आजच्या निकालाप्रमाणेच येत्या काही दिवसांत येणारा सर्वोच्च न्यायालयातला निकालातूनही आम्हाला न्याय मिळेल, असे सांगत मला विश्वास आहे, कारण हा निकालही देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा निकाल असेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज त्र्यंबकेश्वरमधील शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवसैनिक मातोश्रीवर आले होते. उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधत महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश दिला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर रुसवे, फुगवे, गट पडू देऊ नका असा सल्लाही दिला. हायकोर्टात एकीकडे दसरा मेळावा प्रकरणी सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरेंसमोर कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा देत आपण सोबत असल्याची हमी दिली. त्यांच्याशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी मी लवकरच नाशिकला येणार आहे. तिथे गर्दीचा रेकॉर्ड मोडणारा मेळावा घेऊ असा निर्धारही त्यांनी केला.

उत्साह अमाप आहे, पण एकजुटही तशीच ठेवा. आपल्याला प्रत्येक महापालिका जिंकायचीच आहे, शिवसेनेचा भगवा फडकावयचाच आहे. निवडणूक आल्यावर रुसवे, फुगवे, गट पडणं अशा गोष्टी होऊ देऊ नका. उमेदवारी फार माोजक्या लोकांना देता येते. पण आपल्यासाठी भगवा झेंडा हाच आपला उमेदवार आहे. त्यामुळे तयरीला लागा असे आवाहनही शिवसैनिकांना त्यांनी केले.

Exit mobile version