Marathi e-Batmya

अजित पवार यांना मुखाग्नी देताच उपमुख्यमंत्री पदासाठी कोण? चर्चेला सुरुवात

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे दादा, यांच्या अंतविधी आज झाला. मात्र अंतविधीची राख थंड झाली नाही तोच अजित पवार यांचा उत्तराधिकारी कोण ? या चर्चेला राजकिय वर्तुळात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरुवात झाली. त्यामुळे नुकतेच राज्यसभेवर खासदार होत राजकारणात प्रवेश केलेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदीही त्यांचीच निवड करण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती पुढे येत आहे.

वास्तविक पाहता राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणात कोणी उतरायचे आणि कोण नाही याचा निर्णय पवार घराण्याचे वडीलधारी मंडळी अर्थात शरद पवार हे घेत असतात. शरद पवार यांनी निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या घरातील दोन्ही-तीन्ही भाऊ आणि इतर नातेवाईक त्यास दुजोरा देतात आणि त्यानंतर पवार कुटुंबातील व्यक्तीच्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात करतात अशी अलिखित परंपरा सुरु असल्याचे सांगण्यात येते.

त्याचधर्तीवर राज्याच्या राजकारणात अहिल्यानगरच्या कर्जत-जामखेड येथून रोहित पवार यांच्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात झाली. तर बारामतीमधून अजित पवार यांच्या भावाचे चिरंजीव युगेंद्र पवार यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. पण युगेंद्र पवार यांची लढत अजित पवार यांच्याशी थेट होत असल्याने युगेंद्र पवार यांचा पराभव गृहीत धरण्यात आला होता. त्यानुसार तसेच घडले. मात्र अजित पवार यांना तगडे आव्हान युगेंद्र पवार यांचे निर्माण झाले होते.

परंतु या घटनेत सर्वात महत्वाची घटना जिचा उल्लेख करने गरजेचे असल्याचे दिसते ते म्हणजे मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यावरून शरद पवार हे स्वतः नाखुष होते. परंतु पार्थ पवार यास उमेदवारी द्यावी यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा आग्रह होता. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा सर्वसुश्रत आहे. परंतु पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करावी लागल्याने शरद पवार यांनी मात्र माढा लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहिर करावा लागला. त्यानंतर शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यापासून माघार घेत राज्यसभेवर जाणे पसंत केले. ते आजतायगत राज्यसभेवर आहेत.

त्यातच आणखी एका घटनेचा उल्लेख करावा लागले तो म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आल्यानंतर अजित पवार यांच्या गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे राजकारणात प्रवेश करण्याची महत्वकांक्षा सुनेत्रा पवार यांची असल्याची माहिती ओपन सिक्रेट बनले.

आता अजित पवार यांच्या अचानक जाण्याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच जिल्हा परिषद निवडणूकांनंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे शक्यता वर्तविण्यात येत होती. तसेच त्या अनुषंगाने अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून तसे संकेतही देण्यात येत होते. या सगळ्या घडामोडीत राजकारणात नव्याने उतरलेल्या सुनेत्रा पवार यांच्या राजकिय प्रवासाचा निर्णय घेण्यास अजित पवार सक्षम होते. परंतु आता अजित पवार यांचाच अपघाती मृत्यू झाल्याने अजित पवार यांचा गट कोणाचे नेतृत्व मान्य करणार कोण ते नेतृत्व सांभाळणार यावरून अजित पवार यांच्या मृत्यूची घटना जाहिर होताच विचारण्यात येत होता. मात्र शरद पवार यांची काँग्रेसी पद्धतीची रणनीती पाहता अजित पवार यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली पोकळी निश्चितच वेगळ्या पद्धतीने भरून निघणार असल्याचा शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री यांच्या वक्तव्याने मात्र भलताच रंग या परिस्थितीत भरला गेल्याने पुढे काय अशी एक प्रश्नचिन्हांकीत परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देताच अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने एकत्र यावे आणि सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या जाण्याने रिक्त झालेले उपमुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी केली.

या मागणीमुळे आता राज्यातील विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्य आणि राज्याचे राजकीय परिस्थितीबाबत काही नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रश्नाचा सामना विद्यमान नेते शरद पवार आणि सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार यावरच पुढील दिशा ठरणार आहे.

Exit mobile version