राज्यातील आयटी क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे रक्षण करणे, त्याकरिता उपाय योजना सुचविणे याबाबत विस्तृत व दूरगामी कार्यवाही अपेक्षित आहे. त्यासाठी अभ्यास गटाची स्सथान करावी, असे निर्देश ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.
मंत्रालयात पुणे शहरातील हिंजवडी येथील आय टी पार्क मधील विविध आय टी कंपन्यांमध्ये असलेल्या कामगारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कामगार मंत्री बोलत होते.
बैठकीस आमदार शंकर जगताप, अपर मुख्य सचिव श्रीमती आय. ए कुंदन, कामगार आयुक्त एच पी तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस आदींसह आय टी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर म्हणाले, आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर होणारी जबरदस्ती, अन्यायकारक राजीनामा घेण्याची प्रक्रिया आणि एचआर (HR) नियमांमधील त्रुटी दूर करण्यासाठी उपाय योजना आवश्यक आहे. या संदर्भात सखोल चौकशी करण्यासोबतच विशेष अभ्यास गट गठीत करण्यात यावा.
आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर जबरदस्तीने राजीनामा देण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटनांची सखोल चौकशी करावी. एचआर नियम आणि कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या पद्धतींचे नियमन झाले पाहिजे. कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते असलेले आणि जुन्या कंपनीने ‘ डी लिंक ‘ न केलेल्या कर्मचाऱ्यांच्याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला कळविण्यात यावे. याबाबत पत्रव्यवहार करून अशा कर्मचाऱ्यांना मदत करावी.
शेवटी बोलताना आकाश फुंडकर म्हणाले की, शॉप ॲक्ट (Shop Act) परवाना असलेल्या प्लेसमेंट एजन्सींची माहिती घ्यावी. अनेकदा प्लेसमेंट एजन्सींच्या माध्यमातून होणाऱ्या नियुक्तीत अनियमितता आढळते. त्यामुळे अशा सर्व एजन्सींच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची सत्यता तपासण्यात यावी. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवावी.
कामगार विभागाच्या सीआयएस (CIS) प्रणालीचा वापर करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी कशा नोंदवता येतील, याची माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही यावेळी दिल्या.
