Marathi e-Batmya

अंबादास दानवे यांची घोषणा, “जनाधिकार” जनता दरबाराच्या माध्यमातून देणार उत्तर

महायुती सरकार राज्यभर राबवत असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपूर्ण जाहिरातबाजी व इव्हेंट मॅनेजमेंट चा उपक्रम असून प्रत्यक्षात राज्यातील नागरिकांना यातून कसलाही लाभ मिळाला नाही. राज्य शासन या कार्यक्रमात नुसत्या विविध लोकप्रिय घोषणा करते. त्यामुळे या अपयशी कार्यक्रमाची सत्यता सर्व महाराष्ट्रासमोर येण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे प्रत्युत्तरात राज्यव्यापी “जनता दरबार” हा उपक्रम राबविणार आहेत.

या कार्यक्रमाची सुरुवात मुंबई येथील शिवसेना महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालय, “शिवालय” येथून १० जानेवारी पासून होणार आहे. त्यामुळे मुंबई व परिसरातील नागरिकांनी मंत्रालय व इतर शासकीय कार्यालयात प्रलंबित प्रकरणे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. तसेच राज्यव्यापी कार्यक्रम लवकरच घोषित करण्यात येईल, अशी माहितीही दिली.

अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले, “जनाधिकार” तुमच्या हक्काचा जनता दरबार व शासन आपल्या दारीची नुसतीच बात!.. आम्हीच देतो, जनतेस साथ या घोष वाक्याखाली हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याचेही सांगितले.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, सदरील शासन आपल्या दारी हा कार्यक्रम प्रशासकीय अधिकार्‍यांना त्रास देणारा आहे. नागरिकांना बळजबरी या कार्यक्रमास बोलविले जाते. जनतेचा हक्काचा पैसा नाहक वाया घालवला जात असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नुसते भाषणबाजी करतात. त्याच्या या बोलघेवड्या कामकाजाचा भंडाफोड करण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जाणार असल्याचा इशारा दिला.

Exit mobile version