Marathi e-Batmya

फडणवीसांचा शिवसेनेला खोचक टोला, लग्न असले तरी, मुलं झाली तरी श्रेय घ्यायची सवय

मराठी ई-बातम्या टीम

मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्या विरूध्द संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे विरूध्द मुख्यमंत्री ठाकरे असा सामना रंगला असतानाच आता त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. शिवसेनेच्या एकूणच कार्यपध्दतीवर खोचक टोला लगावत म्हणाले की, कुणाचे लग्न असेल तरी त्याचे श्रेय घ्यायचे आणि कुणाला मुलगा झाला तरी त्याचे श्रेय घ्यायचे, अशी सवय काही लोकांना लागली आहे.

ठाण्यात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाण्याचे भाजपा आमदार संजय केळकर यांच्यासह अनेक नेते आणि भाजपा कार्यकर्त्ये उपस्थित होते.

जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासासाठी भाजपा आमदार संजय केळकर यांनीच पाठपुरावा केला होता आणि आमच्या सरकारच्या काळात त्याबाबतचा कायदा तयार करण्यात आला होता. परंतु हा कायदा मंजूर होण्यासाठी एक वर्षाचा काळ का लागला? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित करत गेल्या काही दिवसांपासून काही लोक आमच्याच प्रेरणातून कामे झाल्याचे सांगत त्याचे श्रेय घेत आहेत. त्यामुळे कुणाचे लग्न असेल तरी त्याचे श्रेय घ्यायचे आणि कुणाला मुलगा झाला तरी त्याचे श्रेय घ्यायचे, अशी सवय काही जणांना लागल्याची” टीकाही त्यांनी केली.

आम्ही केवळ शिवरायांची प्रेरणा घेऊन काम करतोय आणि अन्यायाविरोधात संघर्ष करून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही. जोपर्यंत आमच्या विचारात छत्रपती आहेत, तोपर्यंत आमचे विचार कोणी थांबवू शकत नाही. जोपर्यंत आमच्या कृतीमध्ये छत्रपतींचं समर्पण आहे, तोपर्यंत आम्ही अन्याय करू शकत नाही आणि म्हणून शिवजयंती ही छत्रपतींना आठवण्यासाठी नाही तर त्यांच्या मार्गाने चालण्यासाठी आहे. म्हणून मी खरोखर या ठिकाणी सकल मराठा समाजाचं मनापासून अभिनंदन करतो असे ते म्हणाले.

Exit mobile version