Marathi e-Batmya

चंद्रकात पाटील यांचा सवाल, सोमय्या आतंकवादी आहे का?….

पुणे: प्रतिनिधी

किरीट सोमय्यांवर कोणता आरोप आहे, सोमय्या हे काय आतंकवादी आहेत का? ज्यामुळे तुम्ही त्यांच्या घरासमोर १०० पोलिसांचा वेढा घातला आहे ? मुंबईमध्ये दहशतवादी सापडत असताना तुम्ही झोपा काढत आहात का ? असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत त्यात तुमचे भ्रष्टाचारी मंत्री बेपत्ता आहेत. स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी तुम्ही हे षडयंत्र रचले आहे, हे जनतेला दिसत आहे असल्याची टीका त्यांनी केली.

एकाबाजूला पोलिसांनी त्यांना स्थानबध्द केलेले असताना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कोल्हापूर प्रवेश बंदीची नोंटीस बजावली आहे. मात्र पोलिसांनी त्यांना ती नोटीस अद्याप पर्यंत दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला सवाल केला.

भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर १०० पोलिसांनी वेढा दिला आहे. या सरकारच्या कार्यकाळात मुंबईत आतंकवादी उजळ माथ्याने फिरत आहेत, त्यांना अटक करण्याऐवजी भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या सोमय्या यांच्या घराला वेढा देवून स्थानबद्ध करण्यात आले आहे. परंतु सत्ताबळ वापरून या सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का ? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी सरकारला केला.

किरीट सोमय्या यांनी दिलेली प्रतिक्रिया फारच निर्भीड होती. महाराष्ट्रात जी आणीबाणी राज्य सरकारने लावली आहे, ती आता अधिकृतपणे घोषित करून टाका. सोशल मिडियावर काही लिहायचे नाही, महिलांवर अत्याचार झाले की मोर्चे काढायचे नाही, त्यापेक्षा आणीबाणीच घोषित करा ! असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

या देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून १० लाख लोकांना तुरुंगात टाकले. मात्र भारत हा लोकशाही खऱ्या अर्थाने रुजलेला देश आहे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात इथे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवले गेले. आमचा आवाज यांना आता दाबता येणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसारच या सर्व तपास यंत्रणा कार्य करत आहेत, मात्र या सरकारला घटनादेखील मान्य नाही. केंद्राने सत्तेचा दुरुपयोग केला, अशी एकही घटना घडली नाही आणि तसे कधी न्यायालयानेही म्हटले नाही. अनिल देशमुख यांचा दावा चालवण्यासाठीही न्यायालय नकार देत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर राज्य सरकारने किरीट सोमय्या यांच्या विरोधात कितीही कारवाई केली तरी भाजपा सोमय्यांच्या पाठीशी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version