Marathi e-Batmya

काळीजादू करणाऱ्यांशी भाजपचा संबंध काय?

मुंबई: प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने भारतीय जनता पक्षाकडून सर्व हातखंडे वापरले जात आहेत. भिवंडीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर होमहवन, जादूटोणा करण्याचा प्रकार हा त्यातलचा एक आहे. भाजपच्या कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून जादूटोणा करणात आला? असा सवाल उपस्थित करत याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात एलकुंदे गावातील प्रेसिडेन्सी शाळेत ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. या स्ट्राँगरूमबाहेर सोमवारी काहीजण कारमध्ये होमहवन करत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडले व आक्षेपही घेतला. हे लोक कोण आहेत? त्यांच्याकडे जादूटोण्याचे साहित्य कसे आले व या लोकांशी भाजपचा संबंध काय आहे? याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
पराभवाच्या भीतीतून भाजप नेते बेताल वक्तव्य करत सुटलेत. विरोधकांचे आवाज दाबण्याचे प्रकार सुरु आहेत. तसेच सरकारी यंत्रणांची गळचेपी करणे, त्यांच्यावर दबाव टाकण्यापर्यंत भाजपाची मजल गेली आहे. जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा भाजपाचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. काळी जादू करण्यापर्यंत मजल जावी हे डोक्याला हात लावून घेण्यासारखे आहे. भाजपाची विचारधारा ही अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

Exit mobile version