Marathi e-Batmya

फडणवीस म्हणाले, ते सोन्याचा चमचा घेवून जन्माला आलेले मर्जिडीज बेबी

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत भाजपाने आयोजित केलेल्या बुस्टर सभेत भाषण करताना भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत बाबरी पाडताना आपण स्वतः होतो, आपण बदायुच्या तुरूंगातही होता असा गौप्यस्फोट केला. यावरून शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर खोचक टीका करत ते १८५७ च्या लढ्यातही असतील त्यांचे काय असा टोला लगावला होता.
आदित्य ठाकरे यांच्या या टीकेची देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवित म्हणाले की, ते सोन्याचा चमचा घेवून जन्माला आलेले मर्सिडीज बेबी आहेत अशी टीपण्णी केली.
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सिडीज बेबी आहेत. त्यांना ना संघर्ष करावा लागला आहे, ना पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते करु शकतात, पण कितीही खिल्ली उडवली तेव्हा तिथे होतो याचा आम्हाला गर्व असल्याचेही ते म्हणाले.
मी हिंदू असल्याने मागील आणि पुढील जन्मावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मागील जन्म असेल तर कदाचित १८५७ च्या युद्धात मी तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत लढत असेन. आणि तुम्ही असाल तर त्यावेळीही तुम्ही इंग्रजांसोबत युती केली असेल असा टोला लगावत कारण आता ज्यांच्याशी तुम्ही युती केली आहे ते १८५७ ला युद्धच मानत नाहीत. ते शिपायांचं बंड होत असं ते मानतात अशी टीकाही त्यांनी केली.
मुंबईत रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर जाहीर सभा घेऊन भाजपाने शक्तिप्रदर्शन केले. बाबरी पाडली तेव्हा मी तेथे होतो असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदूत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीकेचा मारा केला. बाबरी ही मशीद नव्हती परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो, अशी जाहीर कबुली फडणवीस यांनी दिली. हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्याकरिता तिथे होता. या राम मंदिरासाठी बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसनं घालवल्याचे त्यांनी सांगितले.
मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली, आणि हे सांगतात आम्ही बाबरी मशीद पाडली असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला होता.
बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपाचे नेते होते, असे त्यांनी सांगितले. परंतु ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन उद्धव ठाकरे सत्तेत बसले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
सोमवारी बेस्ट उपक्रमाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या कॅन्टीनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आदित्य ठाकरेंना या वादासंदर्भात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना आदित्य ठाकरें म्हणाले की, आम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढतोय. आम्ही मूळ मुद्द्यांवर काम करतोय. महाविकास आघाडी सरकार हे लोकांची कामं करत आहे. लोकांची चूल कशी पेटती राहील यासाठी आम्ही काम करतोय, असं आदित्य म्हणाले. मात्र राज्यातील विरोधी पक्षातील नेते लोकांची घरं पेटवण्याची कामं करत आहेत, असा टोला आदित्य यांनी लगावला होता.
१८५७ च्या उठावामध्ये पण फडणवीसांचे योगदान असेल,” अशी मोजक्या शब्दांमध्ये खोचक प्रतिक्रिया नोंदवली.

Exit mobile version