Marathi e-Batmya

देशात भाजपा विभाजनकारी मानसिकता आणतेय

मुंबईः प्रतिनिधी
देशात विभाजनकारी मानसिकता करण्यापलीकडे भाजपाला काही दिसत नाही असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.
आज संसदेत नागरिकत्व सुधारणा कायदा पास करण्यात आला. धर्माच्या आधारावर नागरीकत्व कायदा करणं योग्य नाही. आसाम राज्यात बाहेरची लोकं आहेत. नागरिकत्व रजिस्टर झालं पाहिजे. याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये प्रक्रिया सुरू होती. देशातील मुसलमान घुसखोर असल्याचे वातावरण तयार करुन त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु होते. मात्र १९ लाख लोकांना नागरिकत्व मिळाले नसल्याचे समोर आले. त्यात १६ लाख हिंदू, ३ लाख मुस्लिम आहेत. आता १६ लाख हिंदू असल्याचे समोर आल्यावर या १६ लाख हिंदूंचे करायचे काय म्हणून हा कायदा भाजपाने आणला आहे. परंतु त्या- त्या राज्यातील लोक धर्मावर आधारित हा कायदा स्वीकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
घटनेत तरतुद असताना धर्माच्या नावावर नागरिकत्व सुधारणा कायदा करणं योग्य नाही. त्यावर संसदेत आम्ही आवाज उठवणार असल्याचे स्पष्ट करत रिफ्युजी म्हणून स्थान देवू शकतो. परंतु धर्माच्या नावावर नागरिकत्व देणे योग्य नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
घुसखोरांना नागरिकत्व देवून आणखी वाढ होणार आहे. भाजपाने राजकीय फायदा मिळवण्यासाठी हा नागरीकत्व सुधारणा कायदा आणला आहे. राष्ट्रवादी नक्कीच याचा विरोध करेल असे सांगत शिवसेनेनेही याविरोधात आपली भूमिका स्पष्ट केल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Exit mobile version