औरंगाबादः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेमध्ये जरी युती जरी झालेली असली तरी या दोन्ही पक्षांमध्ये सारेच काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. जालना लोकसभा मतदारसंघावरून खा. रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेनेचे मंत्री अर्जून खोतकर यांनी दंड थोपटत दानवेंना पराभूत करण्याचे जाहीर केले आहे. मात्र शिवसेनेकडून याबाबत कोणतीच भूमिका जाहीर करत नसल्याने खोतकर हे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
खा.दानवेंना पराभूत करण्यासाठी राज्यमंत्री अर्जून खोतकर हे काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. याप्रश्नी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी शिवसेनापक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी शेवटची चर्चा करणार असून त्यानंतर ते काँग्रेस मध्ये येतील अशी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या कारभाराला जालनावासिय कंटाळले असून त्यांना निवडणूकीत पराभूत करण्यासाठी जालना जिल्ह्यातील हजारो सर्वपक्षीय कार्यकर्त्यानी निर्धार केल्याचा दावा सत्तार यांनी केला.
नुकतीच या विषयी एक तासभर खोतकर आणि आमच्यात राजकिय चर्चा झाली आहे. दोनच दिवसात खोतकरांकडे आम्ही पुरणपोळीची मेजवाणी घ्यायला जाणार असल्याचे त्यांनी निश्चयपूर्वक सांगितले.
दानवेंच्या पराभवासाठी खोतकरांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ?
