Marathi e-Batmya

विरोधकांच्या रँलीला प्रतित्तुर देणाऱ्या तिरंगा यात्रेला मुख्यमंत्री उपस्थित राहणार

मुंबई : प्रतिनिधी

केंद्रात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभाराच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल यासह अनेक राजकिय पक्षांकडून संविधान बचाव रँलीचे प्रजासत्ताक दिनादिवशी काढण्यात येणार आहे. विरोधकांच्या या रँलीला प्रतित्तुर म्हणून सत्ताधारी भाजपकडून तिरंगा यात्रा काढण्यात येणार असून संविधान सन्मान सभेत त्याचे रूपांतर करून त्याला चोख प्रतित्तुर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईतील कामगार मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सन्मान सभा घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे आमदार विजय (भाई) गिरकर यांनी दिली.

ही तिरंगा यात्रा मुंबई भाजपातर्फे काढण्यात येणार असून मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या नेतृत्‍वाखाली काढण्यात येणार आहे. या यात्रेत मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार आदी सहभागी होणार असून यात्रेच्या समारोपाला होणा-या संविधान सन्‍मान सभेला महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

२६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता चैत्यभूमी येथे भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा शिवाजी पार्क पासून मांटुंगा, रूपारेल कॉलेजकडून ही यात्रा सेनापती बापट मार्गावरून दादर रेल्‍वे स्‍टेशन फुल मार्केटकडून पुढे एलफिस्टन रोड येथील हुतात्‍मा बाबू गेनू क्रिडांगण (कामगार मैदान) येथे या यात्रेचे सभेत रुपांतर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

“संविधान के सन्‍मान में भाजपा मैदान में…” असा नारा देत भाजपाचे हजारो कार्यकर्ते, तसेच भाजपा खासदार किरिट सोमय्या, गोपाळ शेट्टी, पुनम महाजन यांच्‍यासह राज्‍य शासनातील मंत्री विनोद तावडे, प्रकाश महेता, विद्या ठाकूर यांच्‍यासह भाजपाचे पदाधिकारी, आमदार, नगरसेवक या तिरंगा यात्रेमध्‍ये सहभागी होणार आहेत. तर कामगार मैदानात होणा-या संविधान सन्‍मान सभेला मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख वक्‍ते म्‍हणून संबोधित करणार आहेत. यावेळी आमदार अॅड. आशिष शेलार यांचेही भाषण होईल, अशी माहिती भाजपातर्फे प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या प्रसिध्‍दी पत्रकात आमदार भाई गिरकर यांनी दिली आहे.

चैत्यभूमी परिसरात सभा घेण्यास बंदी घालण्याची भीम आर्मीची मागणी

२६ जानेवारी हा दिवस संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच या दिनाचे औचित्य साधून अनेकजण चैत्यभूमी परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे २६ जानेवारी २०१८ रोजी काही राजकिय पक्षांकडून जाहीर सभा अथवा कार्यक्रम घेण्याची अटकळ असल्याने कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात राजकिय पक्षांच्या कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देवू नये अशी मागणी भीम आर्मी या सामाजिक संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे मुंबई पोलिसांकडे केली आहे.   

Exit mobile version