Marathi e-Batmya

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, गारगाई धरण प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी

पालघर जिल्ह्यातील देवळी परिसरात होत असलेल्या गारगाई प्रकल्पामुळे मुंबई शहराच्या पाणी उपलब्धतेमध्ये वाढ होणार आहे. या प्रकल्पाशी संबंधित पुनर्वसन, वनीकरण आणि उभारणीसाठी संबंधित कामांना गती देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गारगाई जलसिंचन प्रकल्प आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वन मंत्री गणेश नाईक, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, प्रधान सचिव एकनाथ डवले यासह वन विभाग आणि नगर विकास विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या गारगाई धरण प्रकल्पाच्या उभारणीला गती देण्यात आली असून, मे २०२९ पर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गारगाई धरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्राच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याला बळकटी मिळण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

गारगाई धरण प्रकल्पाला गतीमे २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट

६५८ हेक्टर बुडीत क्षेत्रात वन जमीन जात असल्याने १४०० हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच बुडीत वन क्षेत्रासाठी वन विकासासाठी वन विभागाला राज्यातील विविध जिल्ह्यात जमीन देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ८४४ हेक्टर जमीन बाधित होणार असून, त्यामध्ये १८६ हेक्टर खासगी जमीन आणि ६५८ हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात एकूण ८०५ हेक्टर जमीन येणार आहे.प्रकल्पामुळे ओगदा आणि खोडदे ही दोन गावे पूर्णतः, तर पाचघर, तिळमाळ, फणसगाव आणि आमले ही चार गावे अंशतः बाधित होणार आहेत.

या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा अंदाजित खर्च ₹३,०६५ कोटी असून, त्यामध्ये धरण, जलबोगदा, पुनर्वसनासाठी आवश्यक २२ पायाभूत सुविधांची निर्मिती तसेच वीज निर्मिती संचाचा समावेश आहे. याशिवाय जमीन अधिग्रहण, पुनर्वसन, पर्यायी वनीकरण, वृक्षांचे निव्वळ वर्तमान मूल्य, सल्लागार सेवा आदी बाबींवरील खर्च कंत्राटी खर्चापेक्षा स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.

गारगाई धरण प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त होत असून केंद्रीय जनजातीय मंत्रालय (MOTA), राष्ट्रीय भूकंप संकल्पन मानक समिती यासह गारगाई धरण प्रकल्प संकल्पचित्र तांत्रिक मंजु-या आणि पर्यावरण परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत. राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाची मंजूरी साठी कार्यवाही करण्यात येत आहे.

यासंदर्भात पुनर्वसन आणि पर्यावरणीय उपाययोजनांवरही विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Exit mobile version