मुंबईः प्रतिनिधी
मागील चार वर्षात राज्यातील फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्षात जनतेला मिळालेले अच्छे दिन यांचे वास्तव दर्शविणारे तब्बल २०० पोस्टर्स मुंबई काँग्रेसकडून लावण्यात येणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.
राज्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच गुंतवणूक आणण्याच्यादृष्टीने मेक इन इंडिया आणि मँग्नेटीक महाराष्ट्र सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परंतु या दोन्ही कार्यक्रमात जाहीर केलेल्या घोषणा आणि आश्वासनांप्रमाणे कोणतीही कृती राज्य सरकारकडून झाली नसल्याची टीका त्यांनी केली.
याउलट सिडकोच्या भूखंड वाटपात १७०० कोटी रूपयांचा घोटाळा, महिलांच्या विरोधातील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, १६ हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार अपयशी ठरल्याचे दिसून येत असून त्याचेच चित्र या पोस्टर्समधून मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या कारभाराची २०० पोस्टर्स मुंबईत लावणार
