Marathi e-Batmya

निवडणूक कारभार आणि संशयातीत प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती

काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीपाठोपाठ विधानसभा निवडणूका झाल्या. लोकसभा निवडणूकीत राज्यात काँग्रेस पक्षाला चांगल्यापैकी यश मिळाले. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत अपेक्षे इतके यश काँग्रेसला मिळू शकले नाही. त्यातच विधानसभा निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी वाढलेल्या मतांच्या वाढीव टक्केवारीवरून सातत्याने संशय व्यक्त करण्यात येत असून या निवडणूकीसह यापूर्वी झालेल्या निवडणूका आणि आगामी काळात होणाऱ्या निवडणूकीच्या दृष्टीने संपूर्ण आणि निवडणूक आयोगाच्या संशयातीत भूमिकेच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्यावतीने ईगल अर्थात इम्पावरर्ड अॅक्शन ग्रुप ऑफ लिडर्स आणि एक्सपर्टची समिती स्थापन केली आहे.

विधानसभा निवडणूकीत काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या जवळपास १०० हून अधिक पराभूत उमेदवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आणि मतदान प्रक्रियेबाबत संशय व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यातच राज्यातील मतदार यांदीमधील घोळाचा मुद्दा काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीकडून सातत्याने उपस्थित करण्यात आल्यानंतरही त्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणतीच भूमिका घेतली नाही. मागील १० वर्षाच्या काळात देशातील मोठ्या राज्यामध्ये भाजपाला विजय मिळत आला आहे. तर छोट्या राज्यामध्ये विरोधकांना विजय मिळत आला आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आतापर्यंतच्या निवडणूकीतील मतदान प्रक्रियेचा आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराची नीटशी माहिती घेण्यासाठी या ईगल समितीची स्थापना करण्यात आली आहे.

काँग्रेसने स्थापन केलेल्या समितीत ज्येष्ठ नेते अजय माकन, खासदार दिग्विजय सिंह, अभिषेक सिंघवी, प्रविण चक्रवर्ती, पवन खेरा, गुरदीप सिप्पल, आमदार नितीन राऊत आणि छल्ला वामशी चांद रेड्डी यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती मागील १० वर्षाच्या काळातील आणि त्यापूर्वीच्या निवडणूकांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका-कामकाज यांचा अभ्यास करणार आहे. तसेच ही समिती मतदार याद्या, मतदान आणि प्रत्यक्ष झालेले मतदान या गोष्टींचा अभ्यास करणार आहे.

त्याचबरोबर देशात मुक्त आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूका पार पडाव्यात यासाठी करावयाच्या शिफारसींचा अहवाल तयार करू तो काँग्रेस पक्षाला सादर करेल असे सांगत या समितीचे कामकाज आणि स्थापना लगेच करण्यात येत असल्याचे काँग्रेसचे सचिव वेणूगोपाल यांनी सांगितले.

Exit mobile version