Marathi e-Batmya

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, बदल गरजेचे; कामाची पध्दतही बदलली पाहिजे

काही महिन्यांपूर्वी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर आणि प्रसिध्द रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा पक्ष प्रवेश होता होता राहिल्यानंतर काँग्रेसच्या नवसंकल्प चिंतन शिबिरात मार्गदर्शन करताना काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचना करत कान पिचक्या दिल्या.
यावेळी सोनिया गांधींनी पक्षात बदल गरजेचे असून आपण आपल्या कामाची पद्धतही बदलली पाहिजे असं स्पष्ट मत मांडत त्या पुढे म्हणाल्या की, आपल्या वैयक्तिक अपेक्षांपेक्षा संस्थेला पक्षाला वरती ठेवले पाहिजे. पक्षाने आपल्याला भरपूर काही दिले असून आता परतफेड करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या चिंतन शिबीरात हजेरी लावली असून पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन केले. राजस्थानमधील उदयपूरमध्ये तीन दिवस हे चिंतन सुरु असणार आहेत. यावेळी सोनिया गांधी यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
देशात ध्रुवीकरणाचे वातावरण आणि भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या ‘कमाल प्रशासन, किमान सरकार’ या घोषणेचा अर्थ वेदनादयीपणे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ देशाला सतत ध्रुवीकरणाच्या स्थितीत ठेवणं तसेच लोकांना नेहमी भीती आणि असुऱक्षित स्थितीत राहण्यात भाग पाडणं आहे. याशिवाय समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या आणि समान नागरिक असलेल्या अल्पसंख्याकांना अत्याचारित आणि अनेकदा क्रूरपणे लक्ष्य करणे असे प्रकार सध्या देशात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
नवसंकल्प चिंतन शिबीरच्या निमित्ताने भाजपा, आरएसएस आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे देशासमोर निर्माण झालेल्या अनेक आव्हानांवर चर्चा करण्याची संधी आपल्याला मिळत असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.
काँग्रेसचं चिंतन शिबीर १३, १४ आणि १५ मे असे तीन दिवस चालणार आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीआधी पक्षाला मजबूत करणे यामागचा मुख्य उद्धेश आहे. शुक्रवारी चिंतन शिबीरामध्ये मार्गदर्शन करताना सोनिया गांधींनी राष्ट्रीय तसंच अर्थपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्याची ही संधी आहे असे त्या म्हणाल्या.

Exit mobile version