Marathi e-Batmya

बिनविरोध निवडणूकीचे ठरलेले असताना मग दोघांचे अर्ज का?

मुंबई: विशेष प्रतिनिधी
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यासाठी ठरलेले आहे. मात्र आज सोमवारी भाजपाच्या दोन डमी उमेदवारांनी अर्ज भरताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन करत आपले बिनविरोध निवडणूकीचे ठरलेले असताना दोन उमेदवारांचे अर्ज कशासाठी? असा सवाल केल्याची माहिती एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने दिली.
साधारणत: सकाळी भाजपाच्या संदीप सुरेश लेले, रमेश काशिराम कराड यांनी अर्ज भरले. त्याची तडक खबर लागताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तातडीने फडणवीस यांना फोन लावला. त्यावेळी फडणवीस यांनी उख्यमंत्र्यांना दिलासा देत आमच्या चार उमेदवारांपैकी कोणाचा अर्ज छाणणीत अपात्र ठरला तर म्हणून आम्ही दोन डमी उमेदवारांचे अर्ज खबरदारीसाठी भरल्याचे सांगत मुख्यमंत्री ठाकरेंना आश्वस्थ केल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीसांच्या या उत्तराने मुख्यमंत्र्यांचा जीवात जीव आल्याने अखेर त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या ९ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रयत्न सुरु केले. त्यांच्या या प्रयत्नासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला.
त्यानुसार उपलब्ध संख्याबळाच्या आधारानुसार भाजपाच्या चार जागा आरामात निवडूण येवू शकतात. तर महाविकास आघाडीचे पाच उमेदवार सहज विजयी होवू शकतात. त्यामुळे १० उमेदवार न देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. तसेच भाजपाने तसा निर्णय घेतला. मात्र आज अचानक भाजपाकडून दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने राजकिय वर्तुळात भुवया उंचविल्या गेल्या. मात्र ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील फोनवरील बोलण्यामुळे निर्धास्थ झाले. तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांना याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीकडूनही खबरदारीचा उपाय म्हणून दोन अतिरिक्त उमेदवारांचे अर्ज भरले.

Exit mobile version