मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिंवसेदिवस वाढत आहे. ही संख्या रोखण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करत आहोत. मात्र काहीजणांकडून लॉकडाऊनचे नियम काटोकोरपणे पाळले जात नाहीत. तसेच राज्यातील पोलिसही ड्युट्या करून थकत, आजारी पडत आहेत. लॉकडाऊन काटेकोर पाळून ही कोरोनाची साखळी तोडायची आहे. त्याचबरोबर राज्यातील पोलिसांना काही प्रमाणात आराम देण्यासाठी आपण केंद्राकडे अतिरिक्त संख्याबळ मागितल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
या लॉकडाऊनच्या काळात कोणाला अजून फार काळ राहण्याची इच्छा नाही. मात्र तुम्ही (नागरिक) जर काटेकोर आणि कडक नियम पाळलात तर जास्त काळ आपल्याला लॉकडाऊनमध्ये राहण्याची वेळ राहणार नाही. त्यामुळे आता लॉकडाऊनमध्ये किती दिवस आपण रहायचे याचा निर्णय तुमच्या हाती असल्याचे सांगत राज्यातील नागरिकांनाच कोरोना टाळण्यासाठी प्रयत्न करत करावे यासाठी आवाहन त्यांनी केले.
लॉकडाऊनच्या काळात औरंगाबाद येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी समाजमाध्यममातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
करमाड येथील रेल्वे अपघातात झालेल्या कामगारांच्या मृत्यूमुळे आपण व्यथित झालोय. तुम्हा कामगारांना घरी सुरक्षित पोहोचविण्यासाठी केंद्राशी त्या त्या सरकारशी चर्चा सुरु आहे. त्या राज्यातील सरकारने काही अटी घातल्या आहेत. त्या अनुषंगाने चाचणी आदी गोष्टी आपण करत आहोत. स्थलांतरीत कामगारांसाठी रेल्वे सुरु करत आहोत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. शिबीर सोडून जावू नका असे आवाहन करत कामगारांना सुखरूप घरी पोहोचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
गेले काही दिवस मुंबईत लष्कराला बोलविणार असल्याची अपवा सुरू आहे. मात्र माझा येथील जनतेवर विश्वास आहे. त्यामुळे मुंबईत लष्कर कधीच येणार नसल्याचे सांगत जबाबदार नागरिकच कोरोनाला रोखण्यासाठी उभे टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिस सतत ड्युटी करून थकले आहेत. त्यांनाही आराम करण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. ते सतत ड्युटी करून आजारी पडत आहेत. त्यामुळे केंद्राकडे अतिरिक्त संख्याबळ देण्याबाबत आपण बोलणी केली आहे. याचा अर्थ आपण पोलिसांना बाजूला सारून दुसऱ्याच्या हाती सोपवित नाही. तर पोलिसांना आराम करायला मिळावा म्हणून अधिकचे संख्याबळ मागवित असल्याचे सांगत याबाबत कोणीही गैरसमज करून घेवू नये असे आवाहनही केले.
डॉक्टर, पोलिस यांच्यावर हल्ले करू नका असे सांगत यांच्यावरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही. तसेच गलथानपणा करू नका असे आवाहन डॉक्टरांना केले. सरकारला कारवाई करण्याची वेळ आणू नका इशाराही त्यांनी यावेळी दिला.
लष्कर मुंबईत येणार नाही, पण केंद्राकडे अतिरिक्त संख्याबळ मागितले
