Marathi e-Batmya

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ढोल ताशाला जागतिक नामांकन

शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढविण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल त्यासोबत स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये चर्चा करून चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

रेशीमबाग मैदानावर मंथन फॉर युवा या उपक्रमांतर्गत ढोल ताशा पथकाचा जागतिक विक्रम तसेच विविध क्षेत्रातील आयकॉन असलेल्या व्यक्तींसोबत थेट संवाद, नशामुक्त महाराष्ट्र व देश यासाठी युवकांना शपथ आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २५ हजार पेक्षा जास्त युवक व युवती सहभागी झाल्या होत्या.

महाराष्ट्राची परंपरा असलेल्या ढोल ताशा पथकाने इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या मध्ये जागतिक विक्रम नोंदविला आहे. आधार नोंद असलेल्या ५८५ ध्वजधारकांच्या या उपक्रमामुळे जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वविक्रम केल्याबद्दल संपूर्ण चमुचे अभिनंदन केले.

२५हजार पेक्षा जास्त युवकांच्या साक्षीने हा उपक्रम पूर्ण झाला असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजची युवा पिढी सर्वच क्षेत्रात आपल्या कौशल्याने नावलौकिक मिळवित आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक सहभाग लाभलेल्या ध्वजधारकांच्या समावेशाबद्दल विश्वविक्रमामध्ये नोंद झाली असून यापूर्वी २६० ध्वज धारकांचा समावेश असलेला विक्रम आज मोडीत निघाला आहे.

सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक रिधिमा पाठक यांनी युवकांचे आयकॉन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच क्रिकेटपटू तिलक वर्मा, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेते दिलीप महादू गावित, अर्जुन देशपांडे, किरण शहाजी यांचे सोबत संवाद साधताना विविध क्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रेरणा व अनुभव युवकांसमोर शेअर केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की संविधानामुळेच लोकशाही प्रगल्भ झाली आहे. आपल्या लोकशाहीमुळेच मला नगरसेवक, महापौर, आमदार आणि मुख्यमंत्री या पदापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. आपल्या आकांक्षा व विश्वास पूर्ण करण्यासाठी संविधानामुळेच कुणीही थांबू शकत नाही असे सांगत त्यांनी आपल्या राजकीय व सामाजिक वाटचालीची माहिती युवकांसमोर मांडली. स्टार्टअप संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, युवकांना शासनाची संपूर्ण मदत करण्याचे धोरण असून स्टार्टअपसाठी इकोसिस्टीम पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या धोरणामध्ये युवकांना शंभर टक्के मदत करण्याचा उद्देश असल्याने युवकांसोबत चर्चा करून आणखी चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल असा विश्वास यावेळी दिला.

मुलांमध्ये असलेल्या सर्वाधिक स्क्रीन टाईम बद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी विचारमंथन सुरू आहे. स्क्रीनवरून मैदानावर कसे वळता येईल याबद्दलही या क्षेत्रातील तज्ञांकडून निश्चित धोरण ठरविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी मंथन फॉर युवाचे आयोजक रितेश गावंडे यांनी स्वागत करून या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. १ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट पर्यंत या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून या उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील आयकॉन म्हणून ओळख असलेल्या युवक व युवतींचा गौरव करून त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची माहिती देण्यात आली.

नशा मुक्त भारत या अंतर्गत युवकांना नशा मुक्तीची शपथ देण्यात आली. यामध्ये अमली पदार्थ मुक्त जीवनशैली, व्यसनापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा त्यासोबतच अमली पदार्थांचा वापर अथवा विक्री कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. तसेच आपली अमली पदार्थ मुक्त युवा पिढी घडविण्यासाठी सक्रिय सहभाग याबद्दल युवकांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शपथ दिली.
आभार प्रदर्शन आयोजक विष्णू चांगदेव यांनी केले.

Exit mobile version