Marathi e-Batmya

अरविंद सावंतांचा सवाल, निवडणूक आयोग बंद असताना त्या बातम्या कशा आल्या?

मागील तीन-चार दिवस दिवाळीची सुट्टी असताना सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या ८.५० लाख प्रतिज्ञापत्रे फॉलमेटनुसार नसल्याने रद्द झाल्याचे वृत्त प्रसारीत झाले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात सर्वच प्रसारमाध्यमांना प्रश्न उपस्थित करत जिथे चार दिवस केंद्रीय निवडणूक आयोगाचे कार्यालयच बंद आहे. सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्राची छाननी झालेली नसताना या बातम्या आल्याच कशा ? असा सवाल उपस्थित केला.

शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कोणाची, निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाला मिळणार याबाबतची याचिकेवरील निर्णय सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. या याचिकेच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे गटाकडून आयोगाकडे कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. तर उध्दव ठाकरे गटाने दिवाळीच्या काही दिवस आधी कागदपत्रे सादर केली. त्यावर अद्याप कोणतेही भाष्य केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अधिकृतरित्या केलेले नाही. तरीही काही प्रसारमाध्यमांमध्ये उध्दव ठाकरे गटाची २.५० लाख प्रतिज्ञा पत्रे रद्दबातल झाल्याची चर्चा सुरु झाली.

यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी त्यांच्या ट्विटर हॅडलवर एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडिओ मध्ये अरविंद सावंत म्हणाले की, मागील चार दिवसांपासून निवडणूक आयोगाचे कार्यालय दिवाळीमुळे बंद आहे. आमच्याकडून जी ८ लाख ५० हजार सदस्य नोंदणीची कागदपत्रे अर्थात प्रतिज्ञा पत्रे सादर कऱण्यात आलेली आहेत. त्याची छाननी अद्याप निवडणूक आयोगाने केलेली नाही. तसेच त्याबाबत अधिकृतरित्या आम्हाला कळविले नसताना या पध्दतीच्या बातम्या बाहेर कशा आल्या ? त्या कोण जाणीवपूर्वक पसरवित आहे असा सवालही उपस्थित केला.

या बातम्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केले आहे. त्यामुळे भाजपाकडून उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या विरोधात एक नॅरेशन तयार कऱण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अशा नॅरेशनला शिवसेना बळी पडणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याबरोबर ज्या उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीचा संदर्भ जाणीवपूर्वक देण्यात येत आहे. मात्र मुलायम सिंग हे अखिलेश यादवच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे गेलेच नाहीत. त्यामुळे हा संदर्भही चुकिचा आहे. हवे तर निवडणूक आयोगातून माहिती घ्या असे आव्हानही त्यांनी यावेळी भाजपा आणि शिंदे गटाला दिले.

Exit mobile version