Marathi e-Batmya

खासदारकी रद्द होण्यास कारणीभूत ठरलेल्या कोलारमधूनच राहुल गांधी यांनी फुंकले प्रचाराचे बिगुल

कर्नाटक विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होण्यास येथील कोलारच्या प्रचार सभा कारणीभूत ठरली होती. त्याच कोलारमधून कर्नाटक निवडणूकीच्या प्रचाराला राहुल गांधी यांच्या सभेने आज सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी झालेल्या प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानी प्रकरणावरून भाजपावर टीकेची झोड उठविली.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, अदानीची शेल कंपनी आहे. या कंपनीतील २० हजार कोटी कोणाचे आहेत? भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की सत्ताधारी पक्षानेच संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही. सहसा विरोधक संसदेतील कामकाज बंद पाडतात. परंतु, पहिल्यांदाच मंत्र्यांनीच कामकाज थांबवले, असा हल्लाबोल केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, मी लोकसभेच्या अध्यक्षांना दोनवेळा पत्र लिहिले, की माझ्यावर झालेल्या आरोपांवर मला बोलायचं आहे. पण मला बोलायची संधी दिली गेली नाही. ते माझ्यावर हसले आणि मला म्हणाले मी काहीच करू शकत नाही. मी म्हणालो की तुम्ही अध्यक्ष आहात, तुम्ही संसदेत काहीही करू शकता, पण तुम्ही तरीही तुमचं काम का करत नाहीत? ते अदानी प्रकरण संसदेत आणण्यास घाबरत होते. त्यानंतर माझी खासदारकीच रद्द झाली, असं सांगितले.

यावेळी भाजपावर आरोप करताना राहुल गांधी म्हणाले, कर्नाटकात भाजपा सरकारने काय केलं? त्यांनी ४० टक्के कमिशन खाल्लं. काम करण्यासाठी भाजपा सरकारने कर्नाटकातील लोकांच्या पैशांची चोरी केली. त्यांनी जे काही केलं ते ४० टक्के कमिशनसाठी केलं. हे मी बोलत नसून कंत्राटदारांच्या संघटनांनी पंतप्रधांनाना पत्र लिहून कळवलं आहे. पंतप्रधानांनी या पत्राचंही उत्तर दिलेलं नाही. पत्राचं उत्तर न देण्याचा अर्थ असा की पंतप्रधानांना सुद्धा कर्नाटकातील ४० टक्के कमिशन मान्य आहे.

तुम्ही जर हजारो करोड रुपये अदानींना देऊ शकता तर आम्हा गरीब, महिला, तरुणांनाही पैसे देऊ शकता. तुम्ही अदानींची मनापासून मदत केली, आता आम्ही कर्नाटक लोकांना मनापासून मदत करणार आहोत अशी ग्वाहीही राहुल गांधी यांनी दिली.

Exit mobile version