नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम बापू आहे. आसाराम बापू, राम रहिम यांनी जे केले तेच या अशोक खरातने केले असून ५८ व्हिडिओ नाही तर सखोल चौकशी केली तर शेकडो व्हिडिओ उघड होतील. महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाला कठोर शिक्षा तर झाली पाहिजे अशी मागणी करून आजपर्यंतचे त्याचे कारनामे पाहता त्याला कोणाचा तरी राजकीय आशिर्वाद असला पाहिजे, त्याच्या मागे ही कोणती राजकीय शक्ती आहे, ते महाराष्ट्राच्या जनतेला समजले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे, राज्यात अंधश्रद्धेविरोधातील कायदा असतानाही अशोक खरात सारखा भोंदूबाबा त्याचे गोरखधंदे बिनदिक्कतपणे करतो व त्याची कोणालाच भनक लागत नाही हे विशेष. अशोक खरातच्या ट्रस्टवर असलेले व त्याला पाठबळ देणारे जे लोक आहेत त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. आसाराम बापू सोबत नरेंद्र मोदी अनेकदा दिसले होते तीच विकृती महाराष्ट्रात फोफावली आहे. नाशिकमध्ये जी विकृती दिसली त्याचे नवल वाटत नाही. पुरोगामी राज्यात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असून असे विकृत लोक सत्तेच्या भरोशावर आपले धंदे राजरोसपणे करतात. भाजपाची खुशामतगिरी करणारी ही प्रवृती महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. अंधश्रद्धा थांबावी यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आयुष्यभर लढा दिला पण त्यांनाच गोळ्या घालून ठार करण्यात आले असे सपकाळ म्हणाले.
शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महिला आयोगाने महिला शोषणाच्या विरोधात काम करणे अपेक्षित आहे. पण महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केली हे त्यांचे कृत्य खरातसारख्या भोंदूना पाठबळ देणारे आहे. असा प्रकार त्यांच्याकडून पहिल्यांदाच झालेला नाही तर पुण्यातील हगवणे प्रकरण असो वा साताऱ्यातील महिला डॉक्टरचे प्रकरण, चाकणकर आरोपीची पाठराखण करताना दिसल्य़ा आहेत. खरे तर त्यांचे कामकाज पाहता आतापर्यंत त्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे होता, अशी मागणीही यावेळी केली.
रासपचे महादेव जानकरांनी घेतली सपकाळांची भेट..
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज गांधी भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात या आधी नांदेड, पुण्यातील कसबा, देगलूर मतदारसंघात पोटनिवडणुका झालेल्या आहेत. नांदेड लोकसभा व देगलूरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेस विरोधात उमेदवार दिले होते त्याठिकाणी काँग्रेस विजयी झाली तर कसबा पोटनिवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे निवडणुका व सहानुभूती हे दोन वेगळे मुद्दे आहेत. अजित पवार यांचे अकाली व अपघाती निधन ही दुःखद घटना आहे. बारामतीचा विचार करता या मतदारसंघात विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पवार विरु्दध पवार निवडणुका झाल्या आहेत व राज्यसभेलाही आठवा उमेदवार असता तर पवार विरुद्ध पवार निवडणूक झालीच असती. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागेवर आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकांसदर्भात त्यांच्याशी करू आणि त्यानंतर उमेदवार उभा करायचा की नाही, याचा निर्णय घेऊ असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
